ऑनलाईन टीम / मुंबई :
मागील दोन दिवसांपासून दडी मारुन बसलेल्या पावसाने आज सकाळपासूनच मुंबई परिसरात आणि पुन्हा उपनगरात हजेरी लावली आहे.
मुंबईसह पूर्व व पश्चिम उपनगरात सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील तीन तासांत मुंबई, ठाणे, रायगड परिसरात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
- सखल भागात साचले पाणी
वसई, विरारमध्ये सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे सायन परिसर, हिंदमाता परिसरात पाणी साचले आहे.
दरम्यान, सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनाची गर्दी झाली असून ट्रॅफिक वाढले आहे. चालकांना गाडी चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. एक्स्प्रेस हायवेवर लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत.
तर, पुढील दोन तासात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
रत्नागिरीतील दापोली, मंडणगडमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत. दापोली, मंडणगडमधील नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. तर कोकणातील सर्व समुद्रांना उधाण आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे किनाऱ्यालगतच्या संपूर्ण परिसराला धोक्याचा इशारा देण्यात आला. गेल्या दोन दिवसांपासून या भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. आज ऑरेंज अलर्ज जारी करण्यात आला असला तरी लोकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.