प्रतिनिधी/ बेळगाव
मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहाची तोडफोड करणाऱयांवर कारवाई करावी. यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी महाराष्ट्र सरकारने कठोर पाऊल उचलावेत. हल्ला करणाऱयांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी, अन्यथा महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकातील दलित संघटना महाराष्ट्र सरकार विरोधात तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा विविध दलित संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढुन निवेदनाव्दारे दिला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर आम्ही शांततेने हा मोर्चा काढत आहे. अशा प्रकारे दलितांवर जर हल्ले होत असतील तर आम्ही कदापीही गप्प बसणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची घटना लिहिली आहे. अशा या थोर व्यक्तीच्या बांद्रा येथील राजगृहावरच हल्ला होतो. ही खरोखरच अत्यंत निषेधार्थ आहे, अशा प्रतिक्रिया यावेळी के. डी. मंत्रेशी, मल्लेश चौगुले यांच्यासह इतर दलित संघटनेच्या पदाधिकाऱयांनी व्यक्त केल्या.
आम्हाला कोणीही कमी समजू नये. आमच्यावर किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपशब्द किंवा अनुचित प्रकार केल्यास त्यांना आम्हीच धडा शिकवू, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दलित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देवून याचा निषेध नोंदविला आहे.
भारतीय बौध्द महासभा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा मंच, चलवादी महासभा, कर्नाटक आंबेडकर युवा सेना यांच्यासह विविध दलित संघटनांच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रा. के. डी. मंत्रेशी, मल्लेश चौगुले, श्रावण शेंडे, गजानन देवरमनी, गौतम लेंढे, विजय भोजगल, महेश शिग्गीहळ्ळी, मल्लेश कुरंगी, मधु तळवार, मोहन कांबळे, राहुल कोलकार, यल्लेश कोलकार, संदीप कोलकार, अर्जुन देमट्टी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.