शिवसेनेच्या माजी आमदाराला प्रवेश नाकारला जातो तिथे असं कोणतं आधुनिकीकरण करणार
चिपळूण / प्रतिनिधी
ज्या जिल्हय़ात मुख्यमंत्री दौऱयावर येतात तिथे त्या जिल्हय़ाचा आढावा घेऊन तेथील प्रश्नांना न्याय देण्याचे काम केले जाते. मात्र कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या पाहणीसाठी आलेल्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी केवळ एका प्रकल्पाची पाहणी करून निघून जाणे हे संयुक्तिक नाही. जिथे शिवसेनेच्या माजी आमदाराला प्रवेश नाकारला जातो त्या प्रकल्पात मुख्यमंत्री असं कोणतं आधुनिकीकरण करणार, असा टोला भाजपचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी लगावला आहे.
ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वीच चिपळूणचा दौरा केला. निसर्ग चक्रीवादळानंतर मुख्यमंत्री जिह्यात येतील अशी आमची अपेक्षा होती. मात्र तसे घडले नाही. कोयना प्रकल्प पाहणी दौऱयात त्यांनी विरोधकांना नको, मात्र स्वपक्षातील आमदारांना जरी निमंत्रित केले असते तरी जिल्हय़ाचे विषय त्यांच्यापर्यंत पोहचले असते. मात्र असं काहीच घडलं नाही. एवढेच नव्हे शिवसेनेच्या माजी आमदारालाच प्रवेश नाकारला गेला. जिल्हय़ाच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडले आहे. चिपळुणात प्रदेश सचिव जठार यांनी जे वक्तव्य केलं ते खोडून काढण्याऐवजी त्यांनाच अडवण्याची भाषा वापरली जाते हे योग्य नाही. जिल्हय़ाची ती संस्कृती नाही. आज भाजपला अडवण्याइतपत ताकद कुणाकडेही शिल्लक राहिलेली नाही. अडवण्याची भाषा कुणी करणार असेल तर आम्हीही त्याला जशास तसे उत्तर देण्यास तयार आहोत.
खडपोली औद्योगिक वसाहतीत निकृष्ट धान्याचा साठा पकडण्यात आल्यानंतर चांगल्या पोषण आहाराचा पुरवठा होईल असे वाटत होते. मात्र आता रत्नागिरीतही भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱयांनी असा साठा उघडकीस आणला आहे. यामुळे जिह्यातील प्रत्येक तालुक्यात युवा मोर्चाचे पदाधिकारी अशी गोदामे शोधून काढून संबंधितांवर कारवाईसाठी प्रयत्न करणार आहेत. सीआरझेडचे उल्लंघन झाले म्हणून हरीत लवादाच्या आदेशानुसार गुहागर जेटी ऑगस्टमध्ये तोडण्यात आली. मात्र ऑक्टोबरमध्ये पुन्हा जेटी बांधण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. तीन पायांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये अधिकारी किती उन्मत्त वागत आहेत याचे हे उदाहरण आहे. शेतकरी कायदा शेतकऱयांच्या हिताचा असतानाही त्याला होत असलेल्या विरोधामागे वेगळेच राजकारण असल्याचे त्यांनी सांगितले.
चौपदरीकरण का रखडले याचे उत्तर खासदारांनी द्यावे
रत्नागिरी लोकसभा मतदार संघातील परशुराम ते पात्रादेवीपर्यंतच्या चौपदरीकरणामध्ये सिंधुदुर्ग जिह्यातील 150 कि. मी. आणि रायगड लोकसभा मतदार संघातील परशुराम ते कशेडीपर्यंतचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र रत्नागिरी जिल्हय़ातीलच काम का आणि कोणामुळे रखडले याचे उत्तर खासदार देतील का? हे सर्व जनतेला समजले पाहिजे. मध्यंतरी पोट कंत्राटदारांनी आंदोलन केल्याचे वाचनात आले. मग मूळ ठेकेदारांनी पोटकंत्राटदार नेमलेच कसे, हे नियमबाह्य आहे. यासंदर्भातील मुळ ठेकेदाराकडून कोणत्या पोटकंत्राटदाराच्या खात्यात पैसे जमा झाले यासंदर्भातील बँक खात्याच्या व्यवहारांची तपासणी व्हायला हवी असेही त्यांनी सांगितले.
यावेळी तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने, नगरसेवक विजय चितळे, परिमल भोसले, नगरसेविका रसिका देवळेकर, जिल्हा सरचिटणीस रामदास राणे, तालुका सरचिटणीस वसंत ताम्हणकर, श्रीराम शिंदे, महेश कांबळी, महेश दीक्षित, प्रणय वाडकर, रत्नदीप देवळेकर, संदीप सुखदरे संदेश ओक आदी उपस्थित होते.