वीरशैव-लिंगायत समुदायाकडून मुख्यमंत्री बदलण्यास तीव्र विरोध : भोजनावळीचा कार्यक्रमही रद्द
प्रतिनिधी /बेंगळूर
राज्यात नेतृत्त्व बदलाच्या चर्चेवरून उलटसुलट चर्चा रंगलेली असतानाच आणखी काही मठाधीशांनी बुधवारी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शविला आहे. येडियुराप्पा यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवू नये यासाठी वीरशैव-लिंगायत समुदायातील नेत्यांनी एकजूट दाखविली आहे. या समुदायातील मठाधीशही येडियुराप्पांच्या पाठिशी आहेत.
तुमकूरच्या सिद्धगंगा मठाचे सिद्धलिंग स्वामीजी यांच्यासह अनेक मठाधीशांनी बुधवारी येडियुराप्पा यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यामुळे हायकमांडनेच 26 रोजी होणारी राज्य भाजप विधिमंडळ नेत्यांची बैठक रद्द करण्याची सूचना दिली आहे का? किंवा अन्य कोणत्या कारणावरून ही बैठक रद्द होत आहे?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
राज्यात नेतृत्त्व बदलाची चर्चा सुरू असतानाच येडियुराप्पा मागील चार दिवसांपासून मौन बाळगून आहेत. राज्यातील लिंगायतसह अनेक समुदायातील मठाधीशांनी येडियुराप्पा यांना उघडपणे पाठिंबा दर्शविला आहे. मंगळवारीही अनेक मठाधीशांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत पाठिशी राहण्याची घोषणा केली आहे. येडियुराप्पाच पूर्ण कालावधीसाठी मुख्यमंत्रिपदी असावेत, असा सल्ला स्वामीजींनी भाजप हायकमांडला दिला आहे.
इच्छुक वाराणासीत
येडियुराप्पा यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला, तर पुढील मुख्यमंत्री कोण, याविषयी भाजप गोटामध्ये चर्चा सुरू झाली आहे. पक्षातील पाच ते सहा जणांची नावे चर्चेत असली तरी या पदासाठी शर्यतीत असलेले आमदार अरविंद बेल्लद यांनी मंगळवारी काशीच्या जगद्गुरुंची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. दोन दिवसांपूर्वी मंत्री मुरुगेश निराणी यांनी देखील वाराणासीला जाऊन काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतले होते.
रेणुकाचार्य दिल्लीत
मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आणि राजकीय सचिव एम. पी. रेणुकाचार्य आणि मंत्री बी. श्रीरामुलू दिल्लीत असून त्यांनी येडियुराप्पा यांना पदच्युत करू नये, अशी विनंती हायकमांडकडे केल्याचे समजते. अनेक मठाधीश येडियुराप्पांच्या पाठिशी असल्याची बाब हायकमांडच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न रेणुकाचार्य यांनी चालविला आहे.
सदानंदगौडांकडून येडिंचे समर्थन
माजी केंदीयमंत्री सदानंदगौडा व गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी येडियुराप्पा यांच्या नेतृत्त्वाचे समर्थन केले आहे. मुख्यमंत्री बदलाविषयी सुरू असलेल्या चर्चेला अर्थच नाही. भाजप नेते अरुणसिंग यांच्या यापूर्वी देखील येडियुराप्पाच मुख्यमंत्रिपदावर राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे तेच पूर्ण कालावधीसाठी मुख्यमंत्रिपदी असतील, अशी प्रतिक्रिया बसवराज बोम्माई यांनी दिली आहे. तर सदानंदगौडा यांनी सध्यातरी मुख्यमंत्री बदल होणार नसल्याचे सांगितले आहे.
विधिमंडळ बैठकीविषयी अनिश्चितता
मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी भाजप हायकमांडच्या सूचनेवरून 26 रोजी बेंगळूरमध्ये पक्षातील विधिमंडळ नेत्यांची बैठक बोलावली होती. राज्यात भाजप सत्तेवर येऊन दोन वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त ही बैठक बोलावण्यात आली असली तरी ती होण्याविषयी साशंकता आहे. आता रविवारी आयोजिलेली भोजनावळही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे येडियुराप्पा यांची पुढील भूमिका काय, याविषयी अद्याप स्पष्टपणे समजू शकलेले नाही.
आपल्या समर्थनार्थ विधाने करू नका!
मुख्यमंत्री बदलाविषयी चर्चा सुरू असतानाच येडियुराप्पा यांनी अखेर प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय घडामोडींच्या आधारे आपल्या समर्थनार्थ कोणीही विधाने करू नयेत. आंदोलन करण्यासाठी कोणीही पुढे येऊ नये. कोणीही शिस्तीचे उल्लंघन करून पक्षाच्या वर्चस्वाला धक्का पोहोचवू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.