गोवा फॉरवर्ड अध्यक्ष विजय सरदेसाई यांची टीका : म्हादईसंदर्भात कोणत्याही हालचाली नाहीत
प्रतिनिधी / मडगाव
गोवा फॉरवर्ड अध्यक्ष व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर पुन्हा एकदा नेम साधताना विधानसभा अधिवेशन संपून दोन आठवडे झाले, तरी म्हादई नदीच्या वादासंदर्भात कोणत्याही हालचाली केल्याचे दिसून येत नसल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी सभागृहाच्या पटलावर पोकळ आश्वासने दिल्याचे आता स्पष्ट होत आहे. कोणाकडूनही दबाव आणला गेला, तरी म्हादई व राज्याच्या हितापेक्षा आपल्या पक्षाचे आणि आपल्या सरकारचे हित मोठे नाही असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते, याकडे सरदेसाई यांनी लक्ष वेधले आहे.
पण वास्तवात परिस्थिती अशी आहे की, केंद्रीय अर्थसंकल्पात मिळालेल्या 300 कोटी रुपयांच्या पॅकेजवर मुख्यमंत्री समाधानी असल्याचे दिसून येत आहे व म्हादईचा त्यांना विसर पडत चालला आहे, अशी टीका सरदेसाई यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयातील वरि÷ वकील अरविंद दातार यांनी केलेल्या निवेदनानुसार, अधिसूचनेला हरकत न घेण्याचे निर्देश सरकारने दिले होते. राज्य सरकारने त्यांना यावर आक्षेप न घेण्यास सांगितले होते असे दातार म्हणाले होते, याकडे त्यांनी पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे.
मुख्यमंत्री व त्यांच्या सरकारवर निशाणा साधताना सरदेसाई यांनी बार्देशमधील अनेक मतदारसंघांत सध्या पाण्याची कमतरता जाणवत आहे आणि मुख्यमंत्री लोकांना खाणींच्या खड्डय़ांत भरघोस पाणी असल्याचे सांगत आहेत, याकडे लक्ष वेधले आहे. याद्वारे खाण व्यवसाय पूर्ववत न करण्याचे सूचवण्याचा ते प्रयत्न करत आहेत काय, असा सवालही सरदेसाई यांनी उपस्थित केला आहे. पाणी वापरण्याच्या बहाण्याने खाणी पुन्हा सुरू न करता गोव्याची पाणीटंचाई दूर करण्याचे प्रयत्न तर नाहीत ना, असे त्यांनी म्हटले असून सरकारने सर्व प्रकरणी आळशी दृष्टिकोन स्वीकारला असल्याची टीका केली आहे. सावंत यांची कर्नाटकातून पाणी आयात करण्याची योजना असल्यास आपल्याला आश्चर्य वाटणार नाही. आता त्यांची गोवा विकायची योजना आहे व स्वयंपूर्ण गोवा हा तर एक फार्स आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.