प्रितनिधी / विटा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष विजयसिंह दिनकर गायकवाड (५९) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. खानापूर तालुक्यासह संपूर्ण राज्यभरात एक आदर्श मुख्याध्यापक म्हणून ते परिचित होते. राज्य शासनाने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविले होते. आपल्या संघटन कौशल्याने त्यांनी गेली दहा वर्षे राज्याच्या मुख्याध्यापक संघटनेचे नेतृत्त्व केले. त्यांच्या निधनाने शिक्षण, सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
खानापूर तालुक्यातील जोंधळखिंडी येथील इंदिरा शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल वाळूज येथे त्यांनी मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावली. गतवर्षी मे महिन्यात ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर संस्थेचे सचिव म्हणून ते कार्यरत होते. त्यांच्या कालावधीत वाळूज हायस्कूलचा शंभर टक्के निकालाचा पॅटर्न राज्यात परिचित झाला होता. केवळ आकडेवारीच नाही तर गुणवत्तापूर्ण निकालासाठी ते नेहमीच आग्रही राहिले. त्यांच्या कालावधीत शाळेला सातत्याने आदर्श शाळा म्हणून नावलौकीक झाला. त्यांच्या कामाची दखल घेऊन राज्य शासनाने त्यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव केला होता.
सांगली जिल्हा मुख्याध्यापक संघाचे त्यांनी वीस वर्षाहून अधिक काळ नेतृत्त्व केले. तर गेल्या दहा वर्षापासून ते महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक मुख्याध्यापक महामंडळाचे नेतृत्त्व करीत आहेत. या कालावधीत मुख्याध्यापक आणि माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळाच्या समस्या शासन दरबारी मांडण्याचे आणि त्या मार्गी लावण्याचे काम त्यांनी केले. इंदिरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषद सदस्य रविंद्र अण्णा देशमुख यांचे ते निकटवर्तीय होते.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर कराड येथील कृष्णा चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मंगळवारी दुपारी उपचार सुरू असतानाच त्यांची प्रणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने लेंगरे परिसरासह संपूर्ण सांगली जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.