प्रतिनिधी / बेळगाव
शहर व उपनगरांमध्ये राबविण्यात येणाऱया स्मार्ट सिटी कामाबाबत तक्रारी होत आहेत. मुचंडी मळा येथील गटारींचे काम सुरू असून बांधण्यात आलेल्या गटारीचे पाणी जाण्यास मार्ग नाही. अशातच गटारीचा स्लोप दोन्ही बाजूने दिला असल्याने सांडपाण्याचा निचरा कसा होणार, असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
स्मार्ट सिटीच्या कामाबाबत तक्रारी होऊनही कंपनीच्या अधिकाऱयांनी कानावर हात व डोळय़ावर पट्टी बांधल्याप्रमाणे नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत मुचंडी मळा परिसरात गटारी निर्माण करणे तसेच रस्ते निर्माण करण्याचे काम करण्यात येत आहे. मात्र, सदर काम व्यवस्थित नसल्याची तक्रार होत आहे. मुचंडी मळा परिसरात सांडपाणी वाहण्यास मार्ग नाही. त्यामुळे येथील गटारींना दोन्ही बाजूने स्लोप देण्यात आला आहे. पण सांडपाण्याचा निचरा होण्यास अडचण होत आहे. गटारीचे बांधकाम करण्यात आले, पण सांडपाण्याचा निचरा कसा होणार, असा मुद्दा उपस्थित झाला आहे.