चौपदरी महामार्ग खुला होऊनही शहरातील धोका जैसे थे, जनतेमध्ये नाराजीचा सूर
प्रतिनिधी /वास्को
वास्कोतील वरूणापुरी ते हेडलॅण्ड सडापर्यंत चौपदरी महामार्ग पूर्ण होऊन तो वाहतुकीला खुला झालेला असला तरी मुरगाव बंदरातील अवजड वाहतुक आजही वास्को शहरातूनच धावत असल्याने तो महामार्ग कुणासाठी असा प्रश्न लोकांमध्ये निर्माण झालेला आहे. नवीन महामार्ग खुला होऊनही शहरातील अवजड वाहतुकीचा धोका अद्याप दूर झालेला नाही. शहरातून होणारी बंदरातील अवजड वाहतुक हेडलॅण्ड सडा मार्गे वळवावी अशी मागणी लोकांमध्ये वाढू लागली आहे.
वेर्णा ते मुरगाव बंदर असा अठरा किलो मिटर अंतराचा चौपदरी महामार्ग हे वास्कोवासियांचे कधी काळी एक स्वप्न होते. पंचवीस वर्षांपूर्वी वेर्णातील नाक्यावरून या महामार्गाच्या कामाला सुरवात झाली होती. मात्र, हा महामार्ग पंचवीस वर्षे रखडला. पहिल्या सहा वर्षांत वास्कोतील मांगोरहिल वरूणापुरी नाक्यापर्यंत तेरा किलो मिटर अंतरापर्यंत हा महामार्ग पूर्ण करण्यात यश आले होते. मात्र, त्यानंतरची वीस वर्षे या महामार्गाचे काम रखरखडतच एकदाचे पूर्ण झाले.
मुरगाव बंदराला थेट जोडल्यानंतरच महामार्गाचा मुळ उद्देश सफल होणार
गांधीनगर ते बोगदापर्यंत हा महामार्ग उड्डाण पुलाव्दारे उभारण्यात आल्याने बायणा किनारा आणि स्थानिक लोकांच्या संभावीत अडचणीही दूर झालेल्या आहेत. हा महामार्ग जमीनीवरून तयार केला असता तर स्थानिक लोकांसमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या असत्या. या महामार्गावर उड्डाण पुल उभारण्यासाठी पूर्वीच्या नियोजनापेक्षा जवळपास साडे चारशे कोटी अतिरीक्त खर्च करण्यात आलेले आहेत. आतापर्यंत पूर्ण झालेल्या या नव्या रस्त्याचे उद्घाटन मागच्या महिन्यात केंद्रीय भुपुष्ठ वाहतुकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले व हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. तरीही हा महामार्ग अर्धवट आहे. महामार्ग थेट मुरगाव बंदराला जोडण्याचे काम पूर्ण व्हायला अद्याप दीड वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. दोन ठिकाणी हा महामार्ग बंदराला जोडला जाणार आहे. हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राज्य सरकार आणि एमपीटीसाठी महत्वकांक्षी प्रकल्प होता. महामार्ग मुरगाव बंदराला जोडून मुरगाव बंदरातील अवजड वाहतुकीची सोय करणे हा या प्रकल्पाचा मुळ उद्देश होता. हा उद्देश महामार्ग शंभर टक्के पूर्ण झाल्यानंतरच सफल होणार असल्याचे दिसून येते.
नवीन महामार्ग खुला झाला तरी वास्को शहरातील वाहतुक असुरक्षीत
मुरगाव बंदराला जोडणारा खास रस्ता नसल्याने अवजड माल वाहतुकीचा प्रचंड ताण वास्को शहरातील रस्त्यावर पडतो. या वाहतुकीमुळे मागच्या पंचवीस वर्षांत वास्कोत अनेक युवकांचे बळी गेलेले आहेत. अनेक अपघात या वाहतुकीमुळे वास्कोतील रस्त्यावर घडत असतात. ही अवजड वाहने काही वेळा रस्त्याच्या मधोमध बंद पडत असतात व वाहतुकीची कोंडी करीत असतात. असे प्रकार सर्रास घडत असल्याने लोकांमध्येही या वाहतुकीबद्दल नाराजी आहे. चौपदरी महामार्ग एकदाचा पूर्ण व्हावा आणि ही वाहतुक त्याच मार्गाने वळवली जावी अशी ईच्छा स्थानिक लोक बाळगून होते. मात्र, पूर्ण झालेला महामार्ग थेट बंदराला अद्याप जोडला गेलेला नसल्यामुळे ही वाहतुक वास्को शहरातूनच होत आहे. हेडलॅण्ड सडय़ावरून बंदरात येण्यासाठी थोड जास्त अंतर कापावे लागणार असल्याने शहरातूनच प्रवेश करणे मालवाहतुक करणारे पसंद करीत आहेत. त्यामुळे शहरातील अवजड वाहतुकीचा धोका दूर होऊ शकलेला नाही. महामार्ग खुला झलेला असला तरी शहरातील वाहतुकीत फारसा फरक पडलेला नाही. महामार्ग बंदराला जोडण्याचे काम पूर्ण झाल्यानंतरच शहरातील अवजड वाहतुक बंद करण्याचे घाटत असल्यास वास्कोवासियांना अजूनही दोन वर्षे धोक्यात काढावी लागणार आहेत.
मुरगाव बंदराकडे होणारी अवजड माल वाहतुक नव्या चौपदरी महामार्गाकडेच वळवावी
सध्या मांगोरहिल वरूणापुरी नाका ते हेडलॅण्ड सडापर्यंत चौपदरी महामार्ग पूर्ण झाल्याने वास्कोतील लोकांची विशेषता सडा बोगदय़ावरील लोकांची वाहतुकीची चांगली सोय झालेली आहे. चिखली ते गोवा शिपयार्ड व वास्को शहरातून सडा, बोगदा, हार्बरपर्यंत जाण्याचे दिवस आता संपले आहेत. आता थेट चौपदरी महामार्गाने ये जा करता येते. त्यामुळे चिखलीपासून वास्को शहर ते हेडलॅण्ड सडा मार्गावरील ताण थोडा कमी झालेला आहे. मात्र, वास्को शहराची मुरगाव बंदरात व तेल टाक्यांकडे येणाऱया व जाणाऱया अवजड वाहतुकीच्या धोक्यातून अद्याप सुटका झालेली नाही. अवजड वाहतुक नवीन महामार्गावरून वळवण्यासाठी प्रशासनावर अद्याप कुणी दबावही आणलेला नाही. वरूणापुरी ते गांधीनगर, बायणा व हेडलॅण्ड सडय़ावरून अवजड वाहनांनी मुरगाव बंदरात ये जा केल्यास वास्को शहराला या धोकादायक वाहतुकीपासून मुक्ती मिळेल. हेडलॅण्ड ते वास्को शहरापर्यंत येणारा रस्ताही आता रूंद करण्यात आलेला असून या अवजड वाहतुकीसाठी ही चांगली सोय आहे. त्यामुळे बंदरातील माल वाहतुक नव्या महामार्गावरूनच वळवण्यात यावी अशी मागणी आता होऊ लागलेली आहे. अवजड वाहतुक त्या महामार्गावरून होत नसल्यास तो महामार्ग कुणासाठी असा प्रश्न उपस्थित होऊ लागलेला आहे.