कलखांब येथे शहीद दिन कार्यक्रमात पुंडलिक कुंडेकर यांचे आवाहन
वार्ताहर / सांबरा
युवक ही राष्ट्राची संपत्ती आहे. युवाशक्ती वाया जाता कामा नये. त्यासाठी युवकांमध्ये राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेम निर्माण झाले पाहिजे. हे कार्य आजच्या माता भगिनी करू शकतात. इतिहासाची पाने चाळल्याशिवाय शहिदांची महती कळणार नाही. त्यासाठी मुलांना वाचन संस्कृतीकडे वळविले पाहिजे, असे आवाहन पुंडलिक कुंडेकर यांनी केले. ते कलखांब येथील राज मातोश्री दीप युथ फौंडेशनतर्फे गावात प्रथमच आयोजित शहीद दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी शाळेचे एसडीएमसी अध्यक्ष रमेश पाटील होते.
प्रमुख पाहुणे म्हणून जगजीत सिंग, गोपी भोजय्या, शिवसेना प्रमुख प्रकाश शिरोळकर, अरविंद नागनुरी, ग्राम पंचायत अध्यक्षा कमलप्पा अष्टगी, ग्रा. पं. सदस्य पिंटू पाटील, यल्लाप्पा नाईक, यल्लाप्पा असोदेकर, यल्लाप्पा मासेकर, प्रवीण तेजम, पिराजी शिंदे आणि सचिन गोरले उपस्थित होते.
विद्यार्थिनींनी ईशस्तवन आणि स्वागतगीत म्हटले. उपस्थित पाहुण्यांचा परिचय नंदु हिरोजी यांनी करून दिला. उमेश हिरोजी यांनी स्वागत केले. राज मातोश्री दीप युथ फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बलराम पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश शिरोळकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीला हार अर्पण केला. जगजीत सिंग यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर अष्टे येथील शहीद जवान पुंडलिक काकतीकर यांच्या मातोश्रींचा सत्कार करण्यात आला. तसेच उचगाव येथील शहीद जवान राहुल सुळगेकर यांच्या आई वीडलांचाही सत्कार करण्यात आला.
विद्यार्थीदशेतच देशभक्ती आणि राष्ट्रप्रेम निर्माण करणे गरजेचे आहे. देशाच्या सीमेवर जवान राष्ट्रभक्ती समोर ठेवून सीमेचे संरक्षण करत असतात. त्यामुळेच आम्ही सुरक्षित आहोत, असेही मौलिक विचार पुंडलिक कुंडेकर यांनी व्यक्त केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना रमेश पाटील म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या शहिदांनी बलिदान दिले. त्यांची आठवण हृदयात साठविले पाहिजे. तरच देशाची उन्नती होईल. याप्रसंगी देशभक्तीपर गायनाचा कार्यक्रम झाला. यावेळी उपाध्यक्षा कस्तुरी करीकट्टी, महादेव बेळगावकर, संजय गाडेकर, शंकर हिरोजी, यल्लाप्पा पाटील, सिदराई हिरोजी, मोहम्मद मुल्ला, रामा पाटील, श्रीकांत कंग्राळकर, मल्लुकांत यल्लारी, ज्योती बेळगावकर, रेश्मा चौगुले, परशराम पाटील, गणपत मोदेकर, परशराम पाटणेकर यल्लाप्पा पाटील तसेच ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी बहुसंख्येने आबालवृद्ध नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन मृणाल खणगावकर यांनी केले. उमेश हिरोजी यांनी आभार मानले.