तेलंगणातील हरिदासपूर गावात होतो आनंदोत्सव
‘मुलगी हे परक्मयाचे धन’ आणि ‘मुलगा म्हणजे वंशाचा दिवा’ असे समज-गैरसमज आता कमी होत असले तरी अजूनही पूर्णपणे कमी झालेले नाहीत. सरकारच्या योजना आणि जागृतीमुळे आता लोकांमध्ये बदल होत आहेत. तरीही मुलगी झाल्यावर आनंदोत्सव साजरा करणारी मंडळी फार कमी असतात. पण तेलंगणातील हरिदासपूर हे गावात तर नवचैतन्यच संचारलेले दिसते. या गावात मुलगी जन्माला आल्यावर गावकरी सामूहिकरित्या आनंदोत्सव अन् जल्लोष साजरा करतात.
हरिदासपूर हे गाव 816 इतक्या लोकसंख्येचे आहे. या छोटय़ाशा गावात कोणाच्याही घरी मुलीचा जन्म झाल्यावर पंचायत भवनात आनंदोत्सव साजरा केला जातो. ही परंपरा गेल्या वर्षापासून सुरु झाली आहे. गावातील एका व्यक्तीला तिसरी मुलगी झाल्यानंतर तो निराश झाला होता. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी गावातील काही जाणकारांनी एकत्र येत मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा केला. या सोहळय़ामुळे कुटुंबियांमधील नैराश्य गायब होऊन नवचैतन्य निर्माण झाले. तेव्हापासून गावामध्ये मुलीचा जन्म झाला की त्याबद्दल आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथाच रुढ झाली आहे.
ज्या दिवशी ज्या घरात मुलीचा जन्म होतो त्या दिवशी गावकरी पंचायतीच्या कार्यालयात एकत्र जमतात. मिठाई वाटली जाते आणि मुलीच्या आई-वडिलांना भेटून शुभेच्छा दिल्या जातात. मुलीचा जन्म झाल्यावर पंचायत भवनातही रोषणाई केली जाते. तसेच पंचायतीच्या पुढाकाराने मुलीच्या नावाने ‘सुकन्या समृद्धी योजना’ खाते सुरू करूनही दिले जाते.