राजापुरात पूरसदृश स्थिती, चिपळुणात धोका
प्रतिनिधी/ रत्नागिरी
आठवडाभरापेक्षा अधिक काळ ब्रेक घेतल्यानंतर कोकणात गेल्या दोन दिवसांपासून मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. शुक्रवारी रात्रीपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जिल्हय़ाला झोडपून काढले आहे. अनेक ठिकाणी सोसाटय़ाच्या वाऱयासह जोरदार पाऊस झाल्याने सर्वच नद्या दुथडीभरून वाहू लागल्या आहेत. राजापूरात पुरसदृश स्थिती निर्माण झाली असून पावसाचा जोर कायम राहील्यास चिपळुणातही पुराचा धोका आहे. जिल्हय़ात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू असल्याने या पावसाचा जनजीवनावर फारसा परीणाम जाणवला नाही.
हवामान खात्याने पुढील पाच दिवस किनारपट्टीवर सोसाटय़ाच्या वाऱयासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. गुरूवारी रात्री मुसळधार कोसळणारा पाऊस शुक्रवारी सकाळी सरीवर बरसत होता व दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासांत सर्वाधिक 82 मिमि पाऊस गुहागर तालुक्यात झाला. त्या खालोखाल राजापूर, रत्नागिरी, लांजा या तालुक्यात पावसाची नोंद झाली.
मजगाव येथे नदीला पूर
रत्नागिरी तालुक्यात या पावसाने दुपारपासून काहीशी उसंत घेतली पण सायंकाळी पावसाचा जोर पुन्हा वाढला होता. यादिवशी सकाळी तालुक्यातील केळये-मजगाव येथील म्हामूरवाडी, पवारवाडी परिसरातून वाहणाऱया नदीला मोठा पूर आला होता. या पुराचे पाणी परिसरातील सखल भागात व्यापले होते. नदी व खाडीच्या संगमावर पुराच्या पाण्याचा निचरा न झाल्याने परिसरात पूरस्थिती निर्माण झाली. तेथील लोकवस्तीकडे जाणारा मार्ग बराच वेळ पूराच्या पाण्याखाली गेला होता.
चिपळुणात वाशिष्ठी, शिवनदी तुडूंब
मुसळधार पावासने चिपळूणमध्ये शिवनदी, वाशिष्ठीसह तालुक्यातील अन्य नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. पालवण येथे एका घराचे नुकसान झाले असून चौपदरीकरणात बांधण्यात आलेल्या गटारांमधील पाण्याचा निचरा योग्यपध्दतीने न झाल्याने डीबीजे महाविद्यालयाजवळील रस्त्यावर पाणी आले.
शहरात लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या पाठीमागील तसेच रेल्वेस्टेशनकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला आहे. बहादूरशेखनाका येथील वाशिष्ठी नदी पुलावर दुसऱयांदा भरण्यात आलेले खड्डे पावसात उखडून गेले आहेत. जुन्या शालीमार अपार्टमेंटमध्ये तळमजल्यामध्ये पाणी घुसल्याने तेथील रहीवाशाना त्रास सहन करावा लागला. पालवण येथील मारूती महादेव सावर्डेकर यांच्या घराचे नुकसान झाले आहे.
वाशिष्ठी, शिवनदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे बाजारपुलाला लागून पाणी वहात होते. पावसाचा जोर आणि नद्यांची वाढलेली पाणीपातळी यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
महामार्ग गटारांमुळे पाणी रस्त्यावर
महामार्ग चौपदरीकरणातील गटारे आणि रस्ते यांची उंची विसंगत असतानाच नाल्याची रूंदीही कमी असल्याने डोंगरावरून येणाऱया पाण्याचा निचरा योग्यपध्दतीने होत नाही. यासंदर्भात अनेक तक्रारीही झालेल्या आहेत. मात्र कोणतीच दखल घेतली न गेल्याने शनिवारी डीबीजे महाविद्यालयासमोर मोठया प्रमाणत पाणी रस्त्यावर आले होते. याचा त्रास रस्त्यालगत असलेल्या नागरिकांना होऊ लागला आहे.
राजापुरात पुरसदृश स्थिती
राजापूरः तालुक्यात शुक्रवारी रात्रीपासून मुसळधारेने कोसळणाऱया पावासामुळे अर्जुना व कोदवली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून राजापूर शहरात पुरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. चिंचबांध, वरचीपेठ, शिळ रस्त्या पुराच्या पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
अर्जुना व कोदवली नदीच्या पाण्यात वाढ होताना या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अर्जुना नदीच्या पुराचे पाणी चिंचबांध ते वरचीपेठ तसेच शिळ रस्त्यावर आल्याने शिळ, गोठणे-दोनिवडे, चिखलगाव या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. अर्जुनासह कोदवली नदीच्या पाण्यातही झपाटय़ाने वाढ होत होती. त्यामुळे शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडण्याची शक्यता आहे. दरम्यान पुराच्या शक्यतेने जवाहर चौक तसेच शिवाजीपथ मार्गावरील दुकानदारांनी दुकानातील साहित्य सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरूवात केली आहे.
चिपळुणात महामार्गालगतच्या घरामध्ये पाणी
संततधार सुरू असलेल्या पावसामुळे गटारे तुंबल्याने महामार्गावरील परशुरामनगरमधील मामा नरळकर, अरविंद नरळकर, सुनीता नरळकर, किर्दवकर, तासे, राजन मेहता यांच्यासह अनेकांच्या घरात पाणी शिरले. यामुळे नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. नगरसेवक शशिकांत मोदी यांनी जेसीबी उपलब्ध करून पाण्याला वाट मोकळी करून देण्यास मदत केली. तसेच नगर परिषद सफाई कामगारांनीही घरात घुसलेले पाणी व चिखल बाहेर काढत मदतकार्य सुरू केले.