ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यात आपण सर्व धर्मिय सण अतिशय साधेपणाने साजरे करीत आहोत. त्याचप्रमाणे येणारी बकरी ईद सावध व साधेपणाने साजरी करावी असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम बांधवांना केले होते. त्यानंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील मुस्लिम बांधवांनी बकरी ईद साधेपणाने साजरी करावी असे आवाहन केले आहे.
बकरी ईद साजरी करण्यासाठी मार्गदर्शक सूचना ट्विट करुन दिल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे :
1) #कोविड19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यास अनुसरुन बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी.
2) सध्या कार्यान्वीत असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दूरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावी.
3) नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी.
4) प्रतिबंधित (Containment) क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निबंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही.
5) बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये.
6) #कोविड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील.
तसेच इथून पुढे व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.