हिंदुत्ववादी विचारसरणीसाठी ओळखल्या जाणाऱया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोठय़ा प्रमाणात मृदासंधारण अभियान चालविण्याचा निर्णय घेतला आहे. रासायनिक खतांचा अतिवापर आणि नको इतक्मया प्रमाणात पाण्याचा उपयोग यामुळे देशभरात दिवसेंदिवस जमिनींची सुपीकता नष्ट होत आहे. त्यामुळे शेतजमिनींचा पोत सुधारणे हे आव्हानात्मक काम बनले आहे. मोठय़ा प्रमाणावर वृक्षारोपण करून आणि रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांचा वापर करून जमिनीचा पोत काही वर्षात सुधारता येतो, हे प्रयोगाने सिद्ध झाले आहे. आता संघासारखी संस्था या कामात मोठय़ा प्रमाणात पुढाकार घेत असून आपले स्वयंसेवक बळ शेतकऱयांच्या हितासाठी उपयोगात आणण्याचा निर्णय या संघटनेने घेतला आहे.
या अभियानाचा प्रारंभ उत्तर प्रदेशातील काशी प्रांतात करण्यात आला आहे. इतिहासकाळापासून भारतात उगवणाऱया वृक्षांचे रोपण मोठय़ा प्रमाणावर केले जात आहे. विशेषतः आवळा व इतर प्रकारच्या औषधी वनस्पतींवर भर देण्यात येत आहे. या वनस्पतींमुळे जमिनीची धूप रोखली जाते. जमिनीतील पाण्याचा स्तर वाढतो. त्याचबरोबर शेतकऱयांना रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांचा आणि शेतखताचा वापर अधिक प्रमाणात करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. शेतकऱयांनाही आता रासायनिक खतांचे दुष्परिणाम लक्षात आल्यामुळे या अभियानाला उत्साही प्रतिसाद मिळत असल्याचे संघाने म्हटले आहे.