तज्ञांचे मत : मंत्री सुधाकर यांच्या नेतृत्त्वाखाली बेंगळुरात कोरोना तांत्रिक सल्ला समितीची बैठक
प्रतिनिधी / बेंगळूर
मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात कोरोनाबाधितांची संख्या वाढणार आहे तर मे च्या अखेरीस कमी होईल, असा तज्ञांचे अनुमान आहे. पुढील स्थिती ओळखून पूरक उपाययोजना हाती घेण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे, असे आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सांगितले. राज्यात कोरोनावर नियंत्रण आणण्याबाबत रविवारी तांत्रिक सल्ला समितीची बैठक झाली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
मंत्री सुधाकर पुढे म्हणाले, मे महिन्याच्या अखेरपर्यंत खबरदारी घेणे गरजेचे आहे. मे च्या पहिल्या आठवडय़ात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढणार आहे. तर महिन्याच्या अखेरीस ही संख्या कमी होईल. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढल्यास रुग्णालयात बेडची मागणी वाढू शकते. यासाठी खासगी रुग्णालयांचे सहकार्य घेणे गरजेचे आहे. सीमाभागातून राज्यात प्रवेश करणाऱया प्रवाशांची तपासणी आणि कोरोना अहवालाची पाहणी करण्याचा सल्ला समितीने दिला आहे. याबाबतचा संपूर्ण अहवाल देण्याची सूचना समितीला दिली आहे. सदर अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करून योग्यरित्या चर्चा करण्यात येईल. यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
खासगी रुग्णालयांनीही सरकारसोबत काम केले आहे. टेली आयसीयू व्यवस्था पहिल्यांदा कर्नाटक राज्य सुरू केले होते. तर खासगी रुग्णालयांनी ही सेवा विनामूल्य दिली होती. अर्थचक्राला अडथळा येण्याबाबत कोणताही सल्ला देणार नाही. पण मोठय़ा जमावांवर निर्बंध आणणे गरजेचे आहे, असे तज्ञांनी सांगितले आहे. गुढीपाडवा सणासाठी सुटी असल्याने लोक आपापल्या गावी जात आहेत. पण याकडे दुर्लक्ष केल्यास राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू शकतो. त्यामुळे जनतेने खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांच्याशी संपर्क साधून कर्नाटक सरकारने कोरोना नियंत्रणासाठी घेतलेल्या खबरदारीबद्दल कौतुक केले आहे. तसेच मायक्रो कंटेन्मेंट झोन वाढविण्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसार याकडे अधिक लक्ष दिले जाईल, असेही मंत्री सुधाकर म्हणाले.
लसीकरणात महिलांचा वाटा 53 टक्के
राज्याला 72 लाख लस केंद्राकडून मिळाले असून आतापर्यंत 61 लाख जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. यापैकी 53 टक्के लस महिलांनीच घेतली आहे. त्यानुसार महिलांनी सर्वच क्षेत्रात पुढे असल्याचे दाखवून दिले आहे, असे मंत्री सुधाकर यांनी सांगितले. बेंगळुरातील अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या लसीकोत्सव कार्यक्रमात सहभागी होऊन ते बोलत होते.