संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे आणि राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर आभार व विरोधकांनी घेतलेल्या आक्षेपांना उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी लोकसभेत आणि मंगळवारी राज्यसभेत जे घाणाघात केले त्याची तुलना होऊ शकत नाही. अक्षरशः सालटी काढणे या वाक्यप्रचाराची आठवण यावी, असे फटक्या मागून फटके पंतप्रधानांनी दिले आणि राजकारण साधताना काँग्रेस व विरोधकांच्या डोळय़ात अंजनही घातले. आता या भाषणावरुन उलट-सुलट आरोप आणि आंदोलने सुरु झाली आहेत. ती होणार हे स्वाभाविक आहे. पंतप्रधान हा देशाचा असतो आणि संसद हे सर्वोच्च सभागृह आहे. तेथे राजकारण नसावे. देशाच्या प्रगतीचा, उन्नतीचा विचार घेऊन सत्तारुढ आणि विरोधकांनी काम करावे,अशी अपेक्षा असते. पण, त्याचे कोणालाही भान नाही. जसे आरोप तसे उत्तर, हाच न्याय सुरु आहे. पंतप्रधानांनी गोवा, उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यातील निवडणुकांचा सत्तासंघर्ष शिगेला निघाला असताना जो मास्टर पंच मारला आहे त्याने काँग्रेस व काँग्रेसचे मित्र पुरते घायाळ झाले आहेत. खरे तर काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी अभिभाषणावर व सरकारच्या कारभारावर तीन आक्षेप घेतले होते. त्यामध्ये यंत्रणाचा गैरवापर, गरीब व श्रीमंत यांच्यातील वाढती दरी आणि सरकारची तानाशाही हे प्रमुख होते. पण, पंतप्रधान मोदींनी हे आरोप थोडे दुर्लक्षून काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी केलेले आरोप हेरुन घेतले आणि त्याला सडकून उत्तर दिले. अक्षरशः घणाघात घातले. काँग्रेसने भारताच्या विकासाचा पाया रचला व भाजपवाल्यांनी येऊन आपला झेंडा लावला. या आरोपाची गंभीर दखल घेत मोदी म्हणाले, काहींना वाटते भारताचा जन्म 1947 साली झाला हा समज व विचारसरणी गंभीर आहे. त्यामुळेच गेल्या 75 वर्षांत दीर्घकाळ सत्ता सांभाळणाऱयाच्या याच मानसिकतेने तांत्रिक विकृती जन्माला आल्या. देशावर 75 साली आणीबाणी लादणाऱयांना लोकशाहीवर दावा करण्याचा अधिकार नाही, असे त्यांनी सुनावले. शिखांचा संहार, गोव्याचे उशीरा स्वातंत्र्य, हृदयनाथ मंगेशकरांच्यावरचा अन्याय, काश्मिरी पंडितांवरचा अन्याय, बाळासाहेब ठाकरेंची बदनामी, असे अनेक मुद्दे त्यांनी मांडत काँग्रेस नसती तर काय झाले नसते, याचा पाढा वाचला. आणीबाणी लादणाऱया व विविध राज्य सरकारे बरखास्त करणाऱया काँग्रेसला लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही, असे सांगत मोदी म्हणाले, भारताच्या लोकशाहीला सर्वात मोठा धोका हा घराणेशाही असलेल्या पक्षाचा आहे. पक्षात घराणेशाही निर्माण होते तेव्हा सर्वप्रथम बळी हा पक्षातील बुद्धीवंतांचा जातो, असे सांगत सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या पक्षात लोकशाहीची मूल्ये जपावीत व सर्वात जुना पक्ष म्हणून काँग्रेसने ही मोठी जबाबदारी पार पाडावी, असा त्यांनी चिमटा काढला. गोवा, पंजाब निवडणुकांवरही पंतप्रधानांचे लक्ष होते, हे लपून राहिले नाही. लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्काराला काँग्रेसचा एकही नेता फिरकला नाही, याची सर्वत्र चर्चा असताना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आकाशवाणीत सेवेत असताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘सागरा प्राण तळमळला’ या गिताला चाल लावली व ते आकाशवाणीवरुन प्रसारित केले म्हणून काँग्रेस सरकार असताना त्यांना आठ दिवसात नोकरीवरुन काढून टाकले. गोव्याच्या या सुपुत्रावर अन्याय केला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गळे काढताना काँग्रेस आपले कर्म विसरली, असे सांगत त्यांनी गोव्यातील जनतेचे लक्ष तर वेधलेच. पण, नेहरु नसते तर देशाबरोबर गोव्याला स्वातंत्र्य मिळाले असते. काँग्रेसमुळे गोव्याला उशीरा स्वातंत्र मिळाले, असे सांगत गोवा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर काँग्रेसला कोंडीत पकडले. मोदींनी काँग्रेसच्या यश-अपयशाचा आणि धोरणाचा व कृतीचा पाढाच वाचला. आत्मनिर्भरता, तीन तलाख मुक्ती, कोरोना काळात केलेले काम, ऐंशी कोटी लोकांना विनामूल्य केलेले धान्य वाटप, गरिबांना निवारा, देशव्यापी लसीकरण, विक्रमी धान्यखरेदी, स्वच्छ पाणी योजना आदी सरकारने केलेले काम त्यांनी सांगितले. पण, त्यापेक्षा त्यांनी विरोधकांना फटके मारले. कोरोना विरुध्दच्या लढय़ात काँग्रेसची भूमिका कशी होती, काँग्रेसने कसे असहकार्य केले. काँग्रेस बैठकीलाही आली नाही आणि शरद पवारांनी कशी योग्य भूमिका घेतली हे सांगताना काँग्रेसच्या धोरणामुळे कोरोना देशभर पसरला, असा गंभीर आरोप त्यांनी केला. पंतप्रधानांनी महाराष्ट्रात काँग्रेसवर कोरोना स्प्रेडर असा आरोप केल्याने काँग्रेस संतापली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडी सरकारही गडबडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रदोही आहेत. पंतप्रधानांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी करत काँग्रेसने भाजप व मोदींच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे. कर्नाटकात बुरख्यावरुन वाद सुरु झाला आहे. तेथे तीन दिवस महाविद्यालय बंद ठेवण्याची वेळ आली आहे. हातात पुस्तक घेऊन अभ्यास करणारी मुले दगड घेऊन जातियवाद करताना दिसत आहेत. किरीट सोमय्यांवरील धक्काबुक्की गाजत आहे. संजय राऊत रोज धुरळा उडवत आहेत. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि देशाच्या विकासाचा प्रगतीचा, उन्नतीचा आगामी कालबद्ध कार्यक्रम यासाठी सामुदायिक वज्रनिर्धार होणे गरजेचे होते. कोरोनामुळे जगभर आणि देशभर फटके बसले आहेत. कोरोनाची लाट ओसरत असली तरी काळजी घेतली पाहिजे. लसीकरण पूर्ण केले पाहिजे. अनेक गोष्टीत राजकारण बाजूला ठेऊन देशहिताचे सामुदायिक संकल्प केले पाहिजेत आणि सुधारणा साधत सामुदायिक निर्धार केला पाहिजे. देशाच्या प्रगतीचा कार्यक्रम, धोरण निश्चित होऊन काम करणे गरजेचे आहे. पण, सदासर्वकाळ राजकारण आणि राजकारण करणारे राजकारणी स्वार्थापलीकडे बघायला तयार नाहीत. विरोधकही तसे आणि सत्तारुढही तसेच. त्यामुळे कुणाला डावे-उजवे करता येणार नाही. मात्र, पंतप्रधानांनी लोकसभेत आणि पाठोपाठ राज्यसभेत जो घणाघात केला त्यांचा विरोधी काँग्रेसला आणि घराणेशाहीतून पक्ष चालवणाऱया पक्षांना फटका बसला आहे. आता या आरोपांवर पुढील काही दिवस गदारोळ उठणार, हे स्वाभाविक आहे.
Previous Articleमहाकवी कालिदासाचे ‘अभिज्ञानशाकुन्तलम्’ (4)
Next Article लोकांचे इंग्रंजी सुधारून झाला अब्जाधीश
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.