मोदींसारख्या लोकोत्तर नेत्याच्या वाढदिवसाने किती लाख/कोटी युवकांना नवीन रोजगार मिळणार आणि त्यांच्या घरात दिवाळी साजरी होणार त्यावरच या सोहळय़ाचे खरे मोजमाप करता येणार असे जाणकारांना वाटले तर त्यात गैर ते काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचा सोहळा शुक्रवारपासून सुरू झाला आहे. देशभर तो मोठय़ा प्रमाणात साजरा करून जनमानसात आपल्या नेत्याचे स्थान अजून भक्कम करण्याचा प्रयत्न साहजिकच सत्ताधारी भाजप करत आहे. 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर असे तीन आठवडे हा सोहळा भव्य प्रमाणात देशभर साजरा करत मोदींचे नेतृत्व किती कणखर आणि लोकोत्तर आहे असे दाखवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
केंद्रीय मंत्री पशुपतीकुमार पारस यांनी मोदी म्हणजे साक्षात भगवंताचे दुसरे रूप आहेत आणि स्वतंत्र भारतातील सर्वात यशस्वी पंतप्रधान आहेत असा त्यांचा गौरव केला आहे. त्यामुळेच मोदींसारख्या लोकोत्तर नेत्याच्या वाढदिवसाने किती लाख/कोटी युवकांना नवीन रोजगार मिळणार आणि त्यांच्या घरात दिवाळी साजरी होणार त्यावरच या सोहळय़ाचे खरे मोजमाप करता येणार असे जाणकारांना वाटले तर त्यात गैर ते काय? दरवषी दोन कोटी युवकांना रोजगार पुरवण्याचे आश्वासन देऊन मोदी सत्तेत आले. गेल्या वर्षभरात तीन-चार कोटी लोकांच्या नोकऱया गेल्या असे तज्ञमंडळी सांगत आहेत. त्यामुळे सरकारने मोठय़ा प्रमाणावर गरीब वर्गाला किमान 2,000 रु.चा दरमहा उदरनिर्वाह भत्ता दिला पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे.लहानपणी अतिशय गरीब परिस्थितीतून मोदी वर आले आहेत असे सांगितले जाते. अशा कठीण परिस्थितीतून मार्ग काढलेल्या मोदींना गरिबांचा कळवळा साहजिकपणे आला पाहिजे. केवळ घोषणांच्या पावसाने प्रत्यक्ष जमिनीवर काहीच पडत नाही, घडत नाही. ‘कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही, आसवांच्या पाण्यावर आम्ही सारी पिके काढली’, असे एका दलित कवीने म्हटले आहे. सामान्य माणसावर अशी परिस्थिती येऊ न देणे हे थोर नेत्याचे काम असते.मोदी हे केवळ अंबानी आणि अदानी अशा मूठभर उद्योगपतींचे मित्र आहेत असा प्रचार/दुष्प्रचार होत असताना आपण साऱया उद्योगजगताचेच दोस्त आहोत हे दाखवण्याची वेळ आहे. कारण सर्व उद्योग आणि व्यापारजगतच एकदिलाने कामाला लागले तर भारत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था व्हायला वेळ लागणार नाही. एक अमेरिकन डॉलर म्हणजे 70 रु. आणि एक ट्रिलियन डॉलर म्हणजे एकावर 13 शून्ये गुणिले 70 एव्हढे रुपये असे जंगी प्रकरण. सध्या हे केवळ असंभव आहे कारण 2016 पासून अर्थतंत्राची अधोगतीच सुरू आहे. कधीकाळी हार्वर्ड विद्यापीठात अर्थशास्त्र शिकवलेल्या सुब्रमण्यम स्वामी यांनी अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी विविध सूचना 12 पत्रांद्वारे मोदींना गेल्या चार-पाच वर्षात केल्या. ‘या पत्रांची केवळ पोचपावतीच मला मिळाली, बाकी काही नाही’, असे स्वामी यांनी खेदाने सांगितले आहे. स्वकियांशीच एवढा दुरावा तर इतरांची किती पर्वा असणार हे उघड आहे.130 कोटीहून जास्त लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात सध्या सर्वात मोठी समस्या म्हणजे महागाई आणि बेरोजगारी होय. कोविड महामारीने अगोदरच तोळामासा तब्येत असणाऱया अर्थव्यवस्थेचे अजूनच तीन तेरा झाले आहेत. 130 कोटींपैकी 40 कोटींचेदेखील अशा सोहळय़ात कल्याण झाले तर भाजपची सत्ता अनेक वर्षे राहील हे सांगायला कोणा राजकीय पंडितांची गरज नाही. राजे लोकांचे राज्य होते तेव्हा राजाच्या वाढदिवसाची लोक आतुरतेने वाट बघायचे. कारण त्याच निमित्ताने राजेलोक बक्षिसाची खैरात करत आणि तळागाळातील माणसाचे आशीर्वाद मिळवत.राजकीयदृष्टय़ा मोदी किती बलवान आहेत ते त्यांनी आपले गृहराज्य गुजरातमध्ये नुकतेच दाखवले. विजय रुपानी यांना मुख्यमंत्रीपदी त्यांनी नारळ दिलाच. एवढेच नव्हे तर रुपानी मंत्रिमंडळातील 24 च्या 24 मंत्र्यांचीदेखील त्यांनी तडकाफडकी हकालपट्टी करून मुख्यमंत्र्यांसह एक जाम नवी कोरी टीम आणली आणि भलेभले समजले जाणारे राज्यातील नेते ‘ब्र’ देखील काढू शकले नाहीत.मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशीच परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी चीनने नुकतीच घुसखोरी केलेला लडाखमधील भारतीय भूभाग जोपर्यंत आम्हाला परत मिळत नाही तोवर चीनशी संबंध सामान्य होऊ शकत नाहीत अशी परत एकदा स्पष्टोक्ती केली. विरोधी पक्षात असताना चीनला आपण ‘लाल आँख’ दाखवू अशा बढाया मारणाऱया मोदींनी गेल्या वर्षभरात चीनचे नावदेखील घेतलेले नाही. नेत्याचा कणखरपणा चीनबाबत कोठे गेला अशी कुजबुज सत्ताधारी वर्तुळातदेखील ऐकू येते. चीन आणि पाकिस्तानची अभद्र युती जास्त घट्ट होत चालली आहे आणि आता चीन अफगाणिस्तानमध्येदेखील पाय पसरू लागला आहे.
पंतप्रधानांच्या वाढदिवसादिवशी अडीच कोटी लोकांचे लसीकरण करून एक विक्रम साधला गेला. जनोपयोगी काम कधीही चांगलेच. पण जर का अडीच कोटी लोकांना एका दिवसात लस दिली जाऊ शकते तर मग ते रोज का घडत नाही. त्याला मोदींचा वाढदिवसच कशाला पाहिजे? लालकृष्ण अडवाणी अशा प्रकाराला ‘इव्हेंट मॅनॅजमेन्ट’ म्हणतात आणि ते एकेकाळी मोदींचे गुरु होते. जर लसीकरणाकरता ‘थँक यू, मोदीजी’ अशी मोहीम चालत असेल तर मग महामारीने जवळजवळ साडे चार लाख लोक देवाघरी गेले त्यातील काही तर प्राणवायूविना. याला जबाबदार कोण? माणूस वनप्रस्थाश्रमाकडे झुकू लागला की तो आपल्या आयुष्याची श्रीशिल्लक काय याचा धांडोळा घेतो असे म्हणतात. भक्तमंडळीनी ढोलनगारे कितीही वाजवले तरी खरा नेता हा भाटगिरीच्या आहारी न जाता आपण कोठे उभे आहोत हे जाणतो आणि देशापुढील आव्हानांना तोंड देण्यास सज्ज होतो. मोदी असे करणार काय त्यावर त्यांचे नाणे भारतीय राजकारणात बंदा रुपया राहणार की नाही ते ठरणार आहे.
सुनील गाताडे