ऑनलाईन टीम / अलिगढ :
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात घोषणा देणाऱयांना जिवंत गाडू, असे वादग्रस्त विधान उत्तरप्रदेशातील राज्यमंत्री रघुराज सिंह यांनी केले आहे.
देशभरातून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध होत आहे. या कायद्याच्या विरोधात देशभरात अनेक हिंसक आंदोलने झाली. अजूनही अलिगड मुस्लिम विद्यापीठात सीएए, एनआरसी आणि एनपीआर विरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहेत. या कायद्याविरोधात लोकांच्या मनात नाराजी असताना रघुराज सिंह यांनी अलिगढ येथे या कायद्याच्या समर्थनार्थ रॅली काढली होती.
यावेळी बोलताना रघुराज सिंह म्हणाले, नागरिकत्व दुरूस्ती कायदा हा भारतीयांच्या विरोधात नाही. तो कोणाचेही नागरिकत्व हिरावणारा नाही. त्यामुळे त्याचा अपप्रचार थांबवावा. भारत हा सर्वधर्मीयांचा देश आहे. पण या कायद्यामुळे जर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात कोणी घोषणाबाजी करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, त्यांना जिवंत गाडू, असा सज्जड दमच त्यांनी यावेळी दिला.