द लेंसेट रिसर्च जर्नलकडून कठोर टीका
वृत्तसंस्था/ लंडन
वैद्यकीय संशोधन नियतकालिक ‘द लेंसेट’ने स्वतःच्या संपादकीयात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यशैलीवर टीका केली आहे. पंतप्रधान मोदींकडून अक्षम्य चूक घडली आहे. मागील वर्षी कोरोना महामारीवर यशस्वी नियंत्रणानंतर दुसऱया लाटेला सामोरे जाताना त्यांनी स्वतःकडून झालेल्या चुकांची जबाबदारी स्वीकारावी असे नियतकालिकाने म्हटले आहे.
भारतात यंदा 1 ऑगस्टपर्यंत कोरोना महामारीमुळे 10 लाख लोकांचा मृत्यू होण्याचा अनुमान द इन्स्टीटय़ूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इवॅल्युएशनचा दाखला देत व्यक्त करण्यात आला आहे. जर असे घडले तर मोदी सरकार या राष्ट्रीय आपत्तीसाठी जबाबदार असणार आहे, कारण कोरोनाच्या सुपर स्प्रेडरच्या नुकसानीबद्दल इशारा असतानाही सरकारने धार्मिक आयोजनांना अनुमती दिली तसेचअ अनेक राज्यांमध्ये प्रचारसभा घेतल्याचे नियतकालिकाने म्हटले आहे.
टीकेला रोखण्याचे प्रयत्न
मोदी सरकार कोरोना महामारीला नियंत्रित करण्याऐवजी ट्विटरवर होत असलेली टीका आणि मुक्त चर्चेला रोखण्यावर अधिक भर देत आहे. सरकारने राज्यांसोबत चर्चा न करताच लसीकरण धोरणात बदल केले आणि 2 टक्क्यांपेक्षाही कमी लोकसंख्येचे लसीकरण करण्यास यश मिळविल्याचा आरोप नियतकालिकाने केला आहे.
आरोग्य यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह
द लेंसेटने भारतातील आरोग्य यंत्रणेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. रुग्णालयांमध्ये रुग्णाला ऑक्सिजन मिळत नसल्याने ते मृत्युमुखी पडत आहेत. भारतातील रुग्णालयांमध्ये आता जागा शिल्लक नाही. वैद्यकीय कर्मचारीही थकले असून संक्रमित होत आहेत. त्रस्त लोक वैद्यकीय ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटर आणि आवश्यक औषधांची मागणी सोशल मीडियावर करत असल्याचे नियतकालिकाने नमूद केले आहे.
सरकारचा निष्काळजीपणा
महामारी संपण्याच्या मार्गावर असल्याची घोषणा आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मार्च महिन्यात केली होती. पण निर्माण झालेले संकट पाहता दुसऱया लाटेच्या वारंवार इशाऱयानंतरही सरकार जागे नसल्याचे स्पष्ट होते. मागील वर्षी महामारीवर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने सरकारने चांगले काम केले होते. पण दुसऱया लाटेत सरकारने घोडचुका केल्या आहेत. महामारीच्या वाढत्या संकटादरम्यान सरकारने पुन्हा एकदा जबाबदारी आणि पारदर्शकतेसह काम करावे. भारताने लसीकरणाचा कार्यक्रम चांगल्याप्रकारे लागू करावा आणि याला वेगाने पुढे नेण्याच्या दृष्टीने काम करावे तसेच सरकारने जनतेला खरी आकडेवारी आणि माहिती उपलब्ध करावी. नेमकं काय घडतंय आणि महामारी संपविण्यासाठी काय करावे लागेल हे सरकारला लोकांना सांगावे लागेल. लॉकडाउनची शक्यताही स्पष्ट करावी लागणार आहे. जिनोम सीक्वेंसिंगचे प्रमाण वाढवून वेरियंट्सची माहिती मिळवावी लागणार असल्याची सूचना द लेंसेटने केली आहे.
हर्ड इम्युनिटी नाही
भारताने महामारीला पराभूत केल्याचे चित्र सरकारने निर्माण केले. पण नव्या स्ट्रेन्समुळे दुसऱया लाटेचा इशारा सातत्याने देण्यात येत होता. भारत हर्ड इम्युनिटीसमीप पोहोचत असल्याचे सांगण्यात येऊ लागले. पण जानेवारी महिन्यात आयसीएमआरच्या सीरोसर्वेत केवळ 21 टक्के लोकसंख्यात कोरोनाविरोधात अँटीबॉडीज असल्याचे दिसून आले होते असे संपादकीयात म्हटले गेले आहे.