नवी दिल्ली / ऑनलाईन टीम
पश्चिम बंगालमध्ये वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येसाठी ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना दोषी ठरवत आहेत…यातून त्यांचे संस्कार दिसतात, अशा शब्दात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे.
स्मृती इराणी म्हणाल्या की, मला हे ऐकून धक्काच बसला की, महामारीसाठी ममता बॅनर्जी मोदीजी आणि अमित शाह यांना जबाबदार ठरवत आहेत. पण हेच ममता बॅनर्जी यांचे संस्कार आहेत. मोदीजी त्यांचा उल्लेख दीदी म्हणून करतात आणि त्या आमच्या नेत्यांसाठी सार्वजनिक व्यासपीठावरून अपशब्दांचा वापर करतात.
जलपैगुडी येथील सभेत बोलताना काल ममता म्हणाल्या होत्या की, पश्चिम बंगाल निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने उपऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आणले आणि त्यामुळेच राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली. इतके दिवस तुम्हे कुठे होतात? तुम्ही कोरोना आणलात आणि पळून गेलात. आम्ही सर्व काही ठीक केलं होतं. जर त्यांनी सर्व लोकांचं वेळेत लसीकरण केलं असतं तर कोरोनाचे नवे रुग्ण आढळले नसते, असं ममता बॅनर्जी भाजपचं नाव न घेता म्हणाल्या होत्या.