ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तरप्रदेशात योगी सरकारने मोफत रेशन योजनेला तीन महिने मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे मार्च 2022 मध्ये संपणारी ही योजना जून 2022 पर्यंत सुरू राहणार आहे. राज्यातील 15 कोटी गरीब जनतेला या योजनेचा लाभ मिळेल, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.
राज्य मंत्रिमंडळाची आज औपचारिक बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी रेशन योजनेबाबत मोठी घोषणा केली. मुख्यमंत्री योगी म्हणाले, मोफत रेशनची योजना पुढील तीन महिने सुरू राहील. मार्च 2022 मध्ये संपणारी ही योजना आता जून 2022 पर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. 15 कोटी लोकांना मोफत रेशनचा लाभ मिळत राहील. राज्यातील अंत्योदय कार्डधारकांना 35 किलो धान्याशिवाय एक किलो साखर, डाळी, मीठ आणि एक लिटर तेल मोफत मिळणार आहे. या योजनेसाठी सरकार 3 हजार 270 कोटी रुपये खर्च करणार आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत नोव्हेंबर महिन्यापर्यंत सर्व रेशनकार्डधारकांना मोफत रेशनचा लाभ देण्यात येत होता. यानंतर योगी सरकारने ही योजना मार्चपर्यंत वाढवली होती. आता नव्या मंत्रीमंडळाने या योजनेला आणखी तीन महिने मुदतवाढ दिली आहे.