ग्राहकांतून संतप्त प्रतिक्रिया : सेवा नियमित करण्याची मागणी
वार्ताहर / कुदनूर
कुदनूरसह परिसरात गेल्या काही दिवसापासून विविध कंपन्यांची मोबाईल आणि टेलिफोन सेवा खंडीत होत आहे. यामुळे ग्राहकवर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, सेवा नियमित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तर येथील बीएसएनएल कंपनीच्या मोबाईल आणि टेलिफोन सेवेचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिसर्या टप्प्यात १७ मेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वजण घरात असून, मुंबई-पुणेसह इतरत्र नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेले नागरिक गावी परतले आहेत. कुदनूरसह कालकुंद्री, कागणी, होसूर, किटवाड, तळगुळी, राजगोळी, दिंडलकोप आदी ठिकाणी बीएसएनएल, आयडिया, एअरटेल आणि जिओ कंपन्यांची सुविधा असून, येथे त्यांचे असंख्य ग्राहक आहेत. लॉकडाऊनच्या परिस्थितीत नागरिकांकडून मोबाईल आणि दूरध्वनी सेवेचा अधिकाधिक वापर केला जात आहे. त्याचबरोबर मुंबई, पुणे आणि इतरत्र नोकरी करत असलेले नागरिक गावी आल्यामुळे ते घरातून ‘वर्क फ्रॉम होम’ या तत्त्वावर काम करत आहेत.
मात्र, काही दिवसापासून मोबाईल आणि दूरध्वनी सेवा अनियमित झाली आहे. आयडिया, एअरटेल आणि जिओच्या मोबाईल ग्राहकांना कॉलड्रॉपसह इंटरनेट सुविधेच्या अडचणी भासत आहेत. तर बीएसएनएलची मोबाईल आणि दूरध्वनी सेवा चार दिवसापासून खंडीत झाली आहे. त्यामुळे संबंधित कंपन्यांच्या ग्राहकवर्गातून अनियमित सेवेबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कोरोना महामारिच्या काळातच संपर्काची साधने कुचकामी ठरत असल्याचे चित्र असून, संबंधित कंपन्यांनी आपल्या सर्व सेवा नियमित कराव्यात अशी मागणी ग्राहकांतून व्यक्त होत आहे.