म्हादईच्या पाण्याचा खारटपणा तपासणार : गेल्या सप्टेंबरमध्येही गोळा केले होते नमुने
प्रतिनिधी / पणजी
गोव्याची जीवनदायिनी म्हादई नदीचे पाणी कर्नाटकाने पळविल्यामुळे गोवा केवळ पाण्यासाठीच मुकणार नाही, तर त्यातून भविष्यात अनेक गंभीर समस्या आणि यक्षप्रश्न निर्माण होणार आहेत. त्यांचे एकेक परिणाम आतापासूनच समोर येऊ लागले असून म्हादईच्या पाण्यामुळे राखले जाणारे अन्य नद्यांच्या पाण्याच्या गोड आणि खारटपणा यांचे संतुलन बिघडू लागले असल्याचे समोर आले आहे.
या बिघडलेल्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी तसेच म्हादईच्या पाण्याचा खारटपणा तपासण्यासाठी नॅशनल हायड्रॉलॉजी इन्स्टिटय़ूटची टीम दुसऱयांदा गोव्यात दाखल झाली आहे. आपल्या दोन दिवसांच्या दौऱयात ते कणकुंबीत म्हादई नदीपासून पणजीत मांडवी नदीपर्यंत विविध ठिकाणचे सँपल्स घेणार आहेत.
मांडवीचा खारटपणा पुन्हा तपासणार
या टीमने यापूर्वी गत सप्टेंबर महिन्यात अशाचप्रकारे म्हादईच्या पाण्याचा खारटपणा तपासला होता. आता आपल्या दुसऱया अभ्यास दौऱयात ते मांडवीच्या पाण्याचा खारटपणा कुठपर्यंत पोहोचला आहे, त्याची तपासणी होणार आहेत. तसेच म्हादईचे वळविलेले पाणी पुन्हा सोडले नाही तर हा खारटपणा आणखी कुठपर्यंत पुढे पोहोचू शकतो त्याचाही अभ्यास होणार आहे. प्राप्त माहितीनुसार हीच टीम येत्या मे महिन्यात तिसऱयांदा गोव्यात येऊन असाच अभ्यास करणार असल्याचे समजले आहे.
हा अहवाल अत्यंत महत्वाचा : केरकर
हा अभ्यास निःपक्षपातीपणे झाल्यास व अहवाल व्यवस्थितपणे न्यायालयात मांडल्यास गोव्याची बाजू भक्कम होऊ शकते, असे मत पर्यावरण तज्ञ राजेंद्र केरकर यांनी व्यक्त केले आहे. याकामी गोव्याने रणनीती म्हणून महाराष्ट्राच्या सिमा भागातील लोकांनाही सोबत घ्यावे लागेल. तसे झाल्यास ते गोव्याच्या फायद्याचे ठरणार आहे, असे केरकर म्हणाले.
एकंदर या निर्णयामुळे आम्ही नुसते हुरळून गेल्यास गोव्याचे फार मोठे नुकसान होऊ शकते, त्यासाठी गोवा सरकारने महाराष्ट्र सरकार व त्यांच्या मुख्यमंत्र्यांची मदत घेऊन यासंदंर्भात त्यांच्या अधीक्षक अभियंत्यांच्या मदतीने वस्तुनिष्ठ पद्धतीने गोव्याला समर्थन दिले, म्हणजेच घडलेल्या परिस्थितीत त्यांनी गोव्याला पाठिंबा दिल्यास गोव्याची बाजू अधिक भक्कम होऊ शकते, असेही श्री. केरकर यांनी पुढे सांगितले.