जलस्रोत खाते व सरकारला करणार मार्गदर्शन
प्रतिनिधी /पणजी
म्हादई जलतंटा प्रश्नावर पाठपुरावा करण्यासाठी व त्यावर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने अर्थात जलस्रोत खात्याने विशेष विभागाची स्थापना केली असून यापुढे हा विभाग म्हादई प्रकरणी सरकारला व खात्याला मार्गदर्शन करणार आहे.
अनुभवी अभियंता दिलीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली हा विभाग स्थापन करण्यात आला आहे. म्हादई नदीवरील प्रकल्प, पाणी तंटा याचिका व इतर प्रश्नांशी ते चांगले परिचित असून त्यांच्या नावास आणि विभागास सरकारने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकत्याच संपुष्टात आलेल्या विधानसभा अधिवेशानात अशा प्रकारचा विभाग स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता त्यांनी केली आहे. म्हादईविषयी सर्व प्रश्न, तंटा आणि इतर समस्या यावर हा विभाग कार्यरत राहणार असून राज्य सरकारला वेळोवेळी शिफारशी करणार असल्याचे सांगण्यात आले. अशा प्रकारच्या वेगळय़ा विभागाची गरज असल्याचे डॉ. सांवत यांनी वारंवार सांगितले होते. जलस्रोतमंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्स यांनी त्यांची संकल्पना उचलून धरली आणि आता हा विभाग प्रत्यक्ष अस्तित्वात आला आहे. जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांनी त्या संदर्भातील आदेश जारी केला आहे.