प्रतिनिधी/ पणजी
म्हादईच्या रक्षणासाठी मगो पक्षाचे जनआंदोलन आज सत्तरीतील उस्ते, साट्टे येथून सुरू होत आहे. दिवसभर हे आंदोलन चालणार आहे. म्हादईबाबत लोकांमध्ये जागृती करणे आणि सरकारचे लक्ष वेधणे या उद्देशाने हे जनआंदोलन उभारण्यात आले आहे. संपूर्ण उत्तर गोव्यात हे आंदोलन चालणार आहे. सुमारे एक हजार कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होतील.
म्हादईबाबत सरकारने स्वीकारलेले धोरण गोव्यासाठी घातक असल्याचा आरोप मगो पक्षाच्या नेत्यांनी चालविला असून गोव्याचे हित जपण्यात सरकार अपयशी ठरल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे. म्हादईबाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका संशयास्पद आहे. त्यामुळे जनआंदोलनाच्या माध्यमातून म्हादईचे रक्षण करणे आवश्यक आहे, असे मगो अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी स्पष्ट केले आहे. आज रविवारी सकाळी 10.30 वाजता आंदोलन सुरू होणार आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे आंदोलन चालणार आहे. या जनआंदोलनातून म्हादईचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गोव्यातील युवा पिढीला म्हादईचे महत्त्व कळायला हवे. पुढील सर्व पिढय़ांसाठी म्हादई महत्त्वाची आहे. म्हादई राहिली तरच गोव्याचे जीवन सुरक्षित राहू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारकडून लोकांची दिशाभूल
म्हादई संदर्भात सरकार जाणीवपूर्वक लोकांची दिशाभूल करीत आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार यांची भूमिका संशयास्पद असल्याचा ठपका मगोने ठेवला आहे. सरकारवर अवलंबून राहिल्यास म्हादईचा विषय आणखी गंभीर होण्याची शक्यता असल्याने संपूर्ण उत्तर गोव्यात आंदोलन करण्यात येणार आहे. फोंडा, तिसवाडी, बार्देश व पेडणे तालुक्यात हे आंदोलन करण्यात येणार आहे.
सर्वच पक्षानी म्हादईचे आंदोलन पुढे न्यावे : चोडणकर
म्हादईसाठी मगो पक्षाने आंदोलनाचा घेतलेला निर्णय योग्य असून म्हादईचे आंदोलन अधिक प्रभावी व्हायला हवे. काँग्रेसने म्हादई जागोर सुरू केला आहे. अन्य बिगर सरकारी संघटनाही आंदोलनाची तयारी करीत आहे. मगो पक्षाने आंदोलन छेडले आहे. जी आंदोलने छेडली आहेत ती प्रभावी व्हायला व्हावी व सरकारला जाग यायला हवी, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले.
म्हादईचे महत्त्व काय आहे हे भाजप नेत्यांना पूर्ण माहीत आहे, मात्र पक्षहित आणि राजकीय स्वार्थ यामुळे भाजप या महत्त्वपूर्ण विषयाकडे डोळेझाक करीत आहे. गोव्यातील जनतेने आता बाहेर पडण्याची वेळ आली आहे. म्हादईचे पाणी कर्नाटकने वळविले आहे. केंद्र सरकारने कर्नाटकला पूर्ण सहकार्य दिले आहे. त्यामुळे सरकारने स्वार्थासाठी गोव्याच्या भवितव्याशी तडजोड केली हे स्पष्ट झाले आहे. गोव्यातील जनतेने म्हादईच्या विषयावर आता सरकारवर अवलंबून राहू नये. म्हादई राखायची असेल तर प्रत्येक गोयकाराने म्हादईच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरावे, असे आवाहनही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केले आहे.