प्रतिनिधी /म्हापसा
जे कुणी फुटीर आहेत त्यांना पक्षात प्रवेश दिला जाणार नाही. म्हापसा मतदारसंघाचा उमेदवार केंद्रात न ठरविता तो म्हापशातूनच ठरविला जाईल. तुम्ही उमेदवारांचे नाव पुढे घेऊन या. नागरिक जो उत्कृष्ट उमेदवार ठरवेल त्यालाच तुमचा उमेदवार म्हणून दिला जाईल अशी माहिती माजी वित्त मंत्री पी. चिदंबरम यांनी दिली.
म्हापसा येथील प्रगती संकुलात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव, विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत, ऍड. रमाकांत खलप, सुधीर कांदोळकर, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, उत्तर गोवा अध्यक्ष विजय भिके, गटाध्यक्ष शशांक नार्वेकर, युवा अध्यक्ष हिमांशू तिवरेकर, महिला अध्यक्ष डॉ. प्रतिक्षा खलप, डॉ. प्रमोद साळगावकर, संगीता परब, गुरुदास नाटेकर उपस्थित होते.
यासाठी प्रामाणिकपणा, मनमिळावूपणा, आदर व विजयाची क्षमता त्या उमेदवारामध्ये असायला पाहिजे असे पी. चिदंबरम म्हणाले. असे झाल्यास म्हापशात काँग्रेसचा उमेदवार विजयी होण्यास उशीर लागणार नाही. भाजप घरी जायलाच पाहिजे. काँग्रेस शिवाय अन्य कुणीही सरकार राज्यात घडवू शकत नाही. 2017 ची चूक आम्ही पुन्हा करू नये. राज्यात जादूचा 21 नंबर काँग्रेसचाच असेल. म्हापशेकार म्हापशेकारांनाच विजयी करून देणार असल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ज्या त्रुटी आहेत त्यात सुधारणा करू- ऍड. खलप
ऍड. खलप म्हणाले की, म्हापशाची जागा कॉग्रेस पक्षाला जिंकण्यास कठीण नाही पण काही त्रुटी आहेत. 22 जागा आहेत तर 12 ते 15 जागांवर लक्ष घातले तर निवडून येऊ शकणार. खाण व्यवसाय, शहा कमिशन लोकांना भाजपने गरिबीत ढकलले. अर्थ व्यवसायाचा कणा मोडून टाकला. प्रत्येक घरात सरकारी नोकरी देणार ही फसवेगिरी करू नका. चुका होत असतात. पडद्यामागे आम्ही काम करीत होतो. सत्ताधारी गटाची ताकद मोठी. अनेकांची घरे बेकायदेशीर आहे, नोकऱयांच्या आश्वासनामुळे लोक भाजपला घबरतात. येत्या निवडणुकीत हातात हात घालून पुढे जाऊया व काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणूया.
आम्हाला बंगालची गरज नाही- दिगंबर कामत
माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत म्हणाले की, पक्ष मजबूत करण्यासाठी आम्ही काय करावे यासाठी आम्ही बैठका घेत आहेत. गेल्या 10 वर्षात भाजप सरकारने काय दिले? आमदार, मंत्री म्हापशात रवींद्र भवन उभारू शकले नाही. 60 रु. पेट्रोल, 400 रुपये स्वयंपाक गॅस, 4 हजार बेकारी भत्ता हे कुठे आहे. ती फक्त आश्वासनेच राहिली. म्हापशाचे राजकारण सांभाळण्यास म्हापसा वासीय समर्थ आहे. तेथे बंगालची गरज नाही असे ते म्हणाले.
स्थिर सरकार फक्त काँग्रेस देऊ शकते
गोवा राज्य प्रमुख गुंडूराव म्हणाले की, 2017 मध्ये काँग्रेस सरकार घडवू शकले नाही यासाठी इतर पक्ष एकत्रित येऊ शकले नाही. त्यात 10 आमदारांनी भाजपात पक्षांतर केले. यासाठी स्थिर सरकार पाहिजे. ते फक्त कॉग्रेस देऊ शकते. गोवा काँग्रेससाठी टर्निंग पॉईंट आहे. गोव्यात काँग्रेस विजयी झाल्यास केंद्रातही होण्यास उशीर लागणार नाही. म्हापशात येत्या निवडणुकीत काँग्रेसचाच उमेदवार विजयी होईल. काँग्रेस पक्षच स्थिर सरकार देणार असे त्यांनी सांगितले.
यावेळी शशांक नार्वेकर, शशिकांत कांदोळकर आदी कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले. सूत्रसंचालन प्रा. रवींद्र फोगेरी तर आभार डॉ. प्रतिक्षा खलप यांनी मानले.