खानापूर तालुका म. ए. समितीच्या बैठकीत सूर : आगामी निवडणुकीसाठी युवकांना समितीच्या प्रवाहात सामावून घेणार
बातमीदार /खानापूर
सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी समितीची स्थापना झाली आहे. सीमाभागातील आपली मराठी अस्मिता दाखविण्यासाठी प्रत्येक निवडणुकीत समितीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मराठी माणसाने आजपर्यंत काम केले आहे. म. ए. समितीत अनेक वेळा गटबाजी झाली असली तरी जि. पं. व ता. पं. निवडणुकीत सर्वांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली हा इतिहास आहे. आगामी जिल्हा व तालुका पंचायत निवडणुकीतही समितीच्या सर्व गट-तटांनी एकत्र येऊन निवडणूक लढविल्यास समितीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील, असा अभिप्राय बैठकीत अनेकांनी व्यक्त केला. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक मंगळवारी शिवस्मारकात झाली. अध्यक्षस्थानी तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष व माजी आमदार दिगंबर पाटील होते.
बैठकीच्या सुरुवातीला म. ए. समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी स्वागत करून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. समितीचे पदाधिकारी श्रीकांत पाटील व अन्य काही कार्यकर्ते दिवंगत झाले. त्याबद्दल बैठकीत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पेट्रोलचे दर वाढविल्याबद्दल राज्य व केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील म्हणाले, ज्या वेळेला मी आमदार होतो, त्यावेळी म. ए. समितीचे दोन्ही गट व शिवसेनेला एकत्रित करून ता. पं. व जि.पं.च्या निवडणुका लढवल्या होत्या. त्यावेळी समितीचा गड राखण्यात म. ए. समिती यशस्वी झाली होती. मराठी माणसं अन्य पक्षात व गटात विखुरली असली तरी निवडणुकीच्या वेळी मात्र एकत्र येतात. त्यामुळे यावेळीही एकी करून निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. एकी करताना काही कमी-जास्त झाले असल्यास त्याबद्दल सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. म. ए. समितीचे माजी तालुकाध्यक्ष विलास बेळगावकर म्हणाले, तालुक्मयातील जनता समितीच्या पाठीशी आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी एक झाले पाहिजे. त्यामुळे समितीचे कार्यकर्ते आमच्या पाठीशी राहून आमच्या उमेदवाराला निश्चितपणे निवडून देतील. त्यासाठी कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱयांनी जोमाने कार्य करावे.
समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी म्हणाले, समितीच्या पदाधिकाऱयांनी कोणत्याही राजकीय पक्षांच्या कार्यक्रमात व आंदोलनात सहभागी होऊ नये. त्यामुळे वेगळा संदेश जनतेत जाऊ शकतो. आपण समिती आणि सीमाप्रश्नासाठी बांधील असल्याकारणाने समितीच्या प्रवाहात राहून केवळ समितीच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे.
समितीचा लढा तीव्र करणे गरजेचे
भूविकास बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील म्हणाले, आगामी काही दिवसात म. ए. समितीचा मेळावा भरविणे गरजेचे असून या मेळाव्याअंतर्गत समितीच्या जाणत्या कार्यकर्त्यांबरोबरच युवकांनाही प्रवाहात सामावून घेऊन समितीचा लढा तीव्र करणे गरजेचे आहे.
कार्याध्यक्ष यशवंत बिरजे म्हणाले, खेडोपाडय़ात जाऊन समितीच्या माध्यमातून कार्य करणे गरजेचे आहे. शिवाय युवा आघाडी लवकरात लवकर स्थापन करून त्यादृष्टीने युवकांनाही समितीच्या लढय़ात ओढणे काळाची गरज आहे.
समितीचे खानापूर शहर अध्यक्ष विवेक गिरी यावेळी म्हणाले, महाराष्ट्रातील समन्वयक मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली म. ए. समितीची एकी करून त्याद्वारे निवडणुका लढवल्यास समितीचा विजय निश्चितच आहे.
यावेळी समितीचे ज्येष्ठ नेते प्रकाश चव्हाण, बाळासाहेब शेलार, नारायण पाटील, शंकर गावडा, वसंत नावलकर, जि. पं. माजी सदस्य जयराम देसाई, नारायण कापोलकर, देवाप्पा भोसले, डी. एम. गुरव, दीपक देसाई, शिवाजी पाटील, अविनाश पाटील, मल्हारी खांबले, रुक्माण्णा झुंजवाडकर, विठ्ठल गुरव, शंकर पाटील आदींनी विचार मांडले. यावेळी शामराव पाटील, प्रवीण पाटील, एल. एच. पाटील, रमेश देसाई, अशोक पाटील, महादेव नाईक, तानाजी कदम, शिवाजी पाटील, मरू पाटील, ईश्वर बोबाटे, प्रल्हाद मादार, भैरू पाटील, विष्णू गुरव, लक्ष्मण पाटील, कृष्णा मन्नोळकर, सुभाष घाडी, यशवंत पाटील आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आभार सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी मानले.