महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे आवाहन
प्रतिनिधी /पणजी
मोदी सरकारचा देशातील अर्थव्यवस्थेवरील ताबा सुटला असून त्याची टक्केवारी उणे (मायनस) झाल्यामुळे कर्जवाढ, करवाढ, आणि सरकारी कंपन्यांची विक्री करण्याची पाळी सरकारवर आली आहे. म्हणूनच महागाईचा भडका उडाला असून तिला रोखण्यासाठी भाजपला रोखा आणि काँगेसला पूर्ण बहुमत देऊन विजयी करा, असे आवाहन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पणजीत काल सोमवारी पत्रकार परिषदेत केले. यंदा भाजपला आमचे आमदार पळवून सरकार स्थापन करण्याची संधी मिळणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
मोदी सरकारवर त्यांनी जोरदार हल्लाबोल करून पुन्हा भाजपला संधी देणे हानिकारक ठरणार आहे. मोदी सरकारमुळेच देशाची अर्थव्यवस्था दुष्टचक्रात सापडली असून मोदींचे आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी एकंदरीत अर्थ व्यवस्थेची पोलखोल केल्याचे चव्हाण म्हणाले.
पत्रकार परिषदेला काँगेसचे गोव्याचे प्रभारी दिनेश गुंडू राव, काँग्रेसच्या प्रवक्त्या अलका लांबा, महिला अध्यक्ष बीना नाईक, सुनिल कवठणकर आणि नौशाद चौधरी उपस्थित होते. यावेळी काँग्रेसने महागाईवरील पुस्तिका लोकार्पण केली.
भाजपला घरी पाठवा
नोटबंदी, तसेच वस्तू आणि सेवाकर लागू करणे हे मोदी सरकारची मोठी चूक होती ‘सध्या देशाची आर्थिक परिस्थिती खुपच वाईट आहे. पण मोदी सरकार ती फुगवून दाखवत आहे. मोदी सरकारचे अर्थव्यवस्थेवरचे नियंत्रण सुटलेले असून स्थिती खुपच गंभीर आहे. यासाठी लोकांनी भाजप सरकारला घरी पाठवण्याची गरज आहे. या वर्षाच्या अंदाजपत्रकात मोदी कसे आकडे दाखवतात, त्याच्यावर देशातील लोकांची नजर आहे, असे चव्हाण म्हणाले.
यंदा भाजप आमदार पळवू शकणार नाही
मोदी सरकारने महागाई वाढवून गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या भावनांशी खेळ केला आहे. लोकांना त्रास केला आहे. असे असताना, त्याच्या भांडवलदार मित्रांचे उत्पन्न दिवसेंदिवस हजारो कोटींनी वाढत आहे. मला पूर्ण खात्री आहे की काँग्रेसला बहुमत मिळणार आणि आम्ही स्थिर सरकार देणार. यंदा भाजपला आमदार पळवून सरकार स्थापन करण्याची संधी मिळणार नाही, असे चव्हाण म्हणाले.
भाजपकाळात महागाई वाढली
मोदी सरकारने गेल्या सात वर्षात पेट्रोल आणि डिझेल (अबकारी कर) मधून वसूल केलेल्या करातून 24 लाख कोटींची लूट केली आहे. एलजीपी गॅसपासून स्वयंपाकघरातील सर्व आवश्यक वस्तू वाढल्या आहेत. आता एलपीजीची किंमत जवळपास 1000 रुपये आहे. खाद्यतेल आणि डाळ 200 रुपयांच्या वर गेली आहे. प्रति किलो चहाच्या पाकिटांची किंमत 2014 साली 130 ते 140 रुपये होती, जी आता 400 ते 500 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. भाजप सरकारच्या काळात खाद्यतेल आणि इतर वस्तूंचे दर तीन ते चार पटीने महागले आहेत. एकंदरी सर्वच वस्तूंचे दर भडकले असून महागाई वाढली असल्याचे चव्हाण म्हणाले.
काँग्रेस सरकारच्या काळात 2014 मध्ये कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 108 डॉलर होती, तरीही काँग्रेस सरकार कमी किमतीत पेट्रोल देण्यात यशस्वी झाले. आता कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 73 डॉलरवर आले आहेत, परंतु सरकारने पेट्रोलचे दर कमी केले नाहीत. गोव्यात पेट्रोलचे दर प्रतिलिटर 100 रुपयांवर पोहोचले आहेत. यावरून भाजप सरकार देशातील जनतेची लूट करत असल्याचे सिद्ध होते, राज्यात काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर हे दर कमी करू, असे आश्वासन पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले.
दिनेश गुंडू राव म्हणाले की, भाजप शासित राज्ये लोकांची लूट करत आहेत, त्यामुळे त्यांना घरी पाठवले पाहिजे. अलका लांबा यांनीही वाढत्या किंमतीवरून भाजप सरकारवर टीका केली. ही महागाईची परिस्थिती मोदीने तयार केली आहे आणि यासाठी काँग्रेस सरकार सत्तेवर येण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या.