गेल्या 21 महिन्यापासून देशात कोरोनाने उच्छाद मांडला आहे. संपत असल्याचे चित्र समोर येत असताना दुपटीने रुग्णवाढ होत आहे. यावर्षी कोरोनाच्या नव नव्या व्हेरियंटने अधिक छळले. मात्र याचवर्षी 16 जानेवारीपासून सुरु झालेल्या लसीकरणामुळे नवे जीवन दिसू लागले. नवनवे व्हेरियंट येत असले तरीही लसीकरणासमोर व्हेरियंट तुलनेने निष्प्रभ ठरत आहे. प्रत्येकाने लसीचे दोन्ही डोस टोचून घेतल्यास शिवाय तज्ञांनी सुचवल्यास बुस्टर डोसही घेतल्यास येणाऱया नव्या 2022 चे स्वागत निश्चितच आरोग्यदायी ठरु शकते…
गेल्या 21 महिन्याचा कालावधी प्रत्येकाने मोजून काढला. मात्र वाईटावर चांगल्या गोष्टी नेहमीच मात करत असतात. त्याप्रमाणे 2020 या वर्षात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाल्याने नवजीवन दृष्टीपथात येऊ लागले. आर्थिक, सामाजिक आणि सर्वच थरातून डबघाईस आलेले जीवनमान नवी भरारी घेताना दिसून आले. वर्षभराच्या आरोग्य क्षेत्रातील घटनांमध्ये दृष्टीक्षेप टाकल्यास बऱयाच अंशी सकारात्मक बाजू दिसून आल्या. मात्र त्या अनुरुप करुन जीवन जगण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर असल्याचे हे वर्ष सरता सरता सांगावेसे वाटते. 2020 या वर्षात कोरोनाचा उच्छाद सर्वांनीच पाहिला. मात्र 2021 च्या दुसऱया पंधरवडय़ात लसीकरणाच्या अंमलबजावणीने नवी आशा उदयास आली. तसे पाहिल्यास याच वर्षात कोरोनाच्या नवनव्या व्हेरियंटचा परिणामही समोर येत होता. मात्र यावर आता आपल्याकडे उपचार असल्याचा आत्मविश्वास 2021 या वर्षाने आपल्या सर्वांना दिला. कोरोनाचे एकूण 50 व्हेरियंट असल्याचे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ सांगत आहेत. मात्र लस असल्याने आगामी काळात कितीही व्हेरियंटच्या रुपाने संकटे आली. तरीही त्याला सामोरे जाण्याचा धीर सर्वांमध्ये आला आहे. सावध तो सुखी असे सतत सांगण्यात येते. त्यामुळे व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर बेफिकीरी न दाखवता सावधगिरी महत्वाची ठरणारी आहे. दरम्यान 16 जानेवारी 2021 पासून देशभरात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. लसीकरणाचा पहिला टप्पा आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्ससाठी घोषित करण्यात आला. यावेळी कोरोना आलेख कमी होत असल्याचे समोर आले. तर 1 मार्च रोजी सुरु झालेल्या लसीकरणाच्या दुसऱया टप्प्यात ज्येष्ठ नागरिक आणि 45 ते 59 वयोगटातील मात्र सहव्याधी आजार असलेल्यांना लस देण्यास सुरुवात झाली. कोरोना प्रतिबंधात्मक असे नियोजन सुरु असतानाच लसीबाबतच्या अफवा देखील पसरण्यास सुरुवात झाली होती. याचवेळी पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या धीम्या गतीने वाढण्यास सुरुवात झाली. यातून मार्च महिन्यात कोरोनाच्या दुसऱया लाटेचा प्रभाव दिसू लागला. त्यामुळे लसीकरणातील लाभार्थ्यांच्या वर्गात वाढ करुन 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस घेण्याची परवानगी पेंद्राकडून देण्यात आली. जस जसे लस लाभार्थ्यांचा वर्ग वाढत होता. तस तसे लसीच्या तुटवडय़ाच्या घटना समोर येऊ लागल्या. नवीन रुग्ण आणि सक्रिय रुग्ण असे दोन्ही वाढताना दिसू लागले. 2 मे 2021 रोजी राज्यात 63 हजार 282 नवे रुग्ण आढळले होते. तर आठ मे रोजी ही संख्या 53 हजार 605 एवढी होऊन दहा हजाराचा फरक दिसून आला. दुसऱया लाटेमुळे मृत्यू दराचे प्रमाणही वाढत असल्याचे स्पष्ट होत होते. याच कालावधीत दुसरे महत्वाचे निरीक्षण मांडण्यात आले ते म्हणजे लस घेतलेल्या व्यक्तींनाही कोरोनाची बाधा होत असल्याचे समोर येत होते. यातून लसीकरणाबाबत संभ्रम निर्माण होत होता. त्यामुळे सरकारने लसीकरणाबाबत जागरुकता निर्माण करण्यास सुरुवात केली. 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याची परवानगी पेंद्राकडून मिळाली.
दरम्यान कोरोनाच्या दुसऱया लाटेचे वैशिष्टय़ म्हणजे त्याची विविध व्हेरियंटची रुपे. या प्रत्येक व्हेरियंटची लक्षणे आणि आरोग्यावरील परिणाम वेगवेगळे असण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. 50 व्हेरियंटपैकी डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग डोळ्य़ात पाणी आणणारा ठरत होता. तर याच दरम्यान वेंटीलेटर्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा तुटवडा सारख्या समस्यांमुळे जीवनमान ढवळून निघाले होते. सरकारकडून विविध पद्धतीतून यावर मात केली जात होती. याच काळात रेमेडेसीवीर आणि प्लाझ्मा थेरेपी उपचार पद्धती हटविण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. तर दुसऱया बाजूला जीवन सुसह्य करण्यासाठी लॉकडॉऊन टप्प्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येत होते. सण उत्सवातून उसळणाऱया गर्दीमुळे व्हेरियंटसोबत म्युकरमायकोसिस म्हणजे बुरशीचा संसर्ग पसरु लागला होता. म्युकरमायकोसिसवर ऍम्फोटेरेसिनीबी इंजेक्शन जीवनदायी ठरत होते. मात्र यात अनेकांनी आपले डोळे गमावल्याचे समोर आले.
देशात आणि राज्यात भयावह स्थिती असताना देखील मुंबईतील कोरोना रुग्ण संख्या कमी होत असल्याने मुंबई मॉडेलचे जगात कौतुक होण्याचा गौरवास्पद प्रसंग याच वर्षातील आहे. या मुंबई मॉडेलचे जागतिक आरोग्य संघटनेसह जगातील बहुतांश देशांनी स्तुती केली. तर राज्यात एका दिवसात 14.39 लाखा पेक्षा अधिक जणांचे लसीकरण केले असल्याची घटना सप्टेंबरमध्ये घडली होती. अशी लसीकरणातील रेकॉर्डब्रेक कामगिरी राज्य सतत करत होते. दरम्यान कोरोना रुग्ण संख्या कमी होत असल्याने बेफिकीरीतून दुसऱया डोसला टाळतानाही दिसून येत होते. हे चित्र अद्याप कायम आहे. मात्र नोव्हेंबर महिन्या दरम्यान कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन या व्हेरियंटची दहशत जगात पसरली असताना विमानमार्गाने तो राज्यात पसरताना दिसू लागल्यावर लसीकरणाचे महत्व पटवून घ्यावे असे आवाहन करण्यात येऊ लागले. हा व्हेरियंट डेल्टापेक्षा कमी घातकी असला तरीही तिसऱया लाटेसाठी तो कारणीभूत ठरु शकतो असे सरत्या वर्षाच्या साक्षीने भिती व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात रविवारपर्यंत 141 ओमिक्रॉनचे रुग्ण तर मुंबईत एकूण 73 ओमिक्रॉन रुग्ण नोंद आहे. देशात उद्भवणाऱया तिसऱया लाटेस कारणीभूत हा वेगाने पसरणारा व्हेरियंट ठरु शकतो, असा अंदाज तज्ञांकडून केला जात आहे.
– राम खांदारे