वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात आजवर 7 सामने झाले आहेत आणि यातील प्रत्येक वेळी भारतानेच विजयश्री मिळवली आहे. यातील काही वेळा पाकिस्तान जरुर विजयाच्या उंबरठय़ावर पोहोचला. पण, प्रत्येक वेळी त्यांना उंबरठय़ावरुनच परत फिरावे लागले. वकार युनूसने याचे विश्लेषण करताना पाकिस्तानला का अपयश स्वीकारावे लागले, हे नमूद केले आणि तो म्हणतो त्यानुसार यातील प्रत्येक वेळी पाकिस्तानला दडपण झेलून नैसर्गिक खेळ साकारणे अजिबात शक्य झालेले नाही आणि याच कारणामुळे त्यांना प्रत्येक वेळी पराभवच स्वीकारावा लागला आहे.
वकारला 1992 विश्वचषक संघात नसल्याची खंत आजही वाटते. त्यावेळी तो दुखापतीमुळे पाकिस्तानी संघातून बाहेर फेकला गेला होता. 1996 विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताने विजयश्री संपादन केली. 1992 मध्ये पाकिस्तानने विश्वचषक जिंकला. पण, त्या स्पर्धेतही भारताविरुद्ध पाकिस्तानच्या पदरी हारच आली. 1999 मध्ये युनूस पुन्हा पाकिस्तानी संघातून बाहेर होता. 2003 मध्ये त्याच्याकडे नेतृत्वाची धुरा होती. तेथेही भारतच सरस ठरला. याशिवाय, 2011, 2015 व 2019 मधील विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानची भारताविरुद्ध हाराकिरीच झाली.
वकार याबाबत म्हणतो, ‘आम्ही अन्य क्रिकेट प्रकारात उत्तम प्रदर्शन साकारले. पण, विश्वचषक स्पर्धेत सातत्याने आमची निराशा झाली. भारताने आमच्यापेक्षा सरस प्रदर्शन साकारले. पण, आम्ही दडपण झेलण्यात कमी पडतो, हे कबूल करावे लागेल. 2003 मधील भारतीय संघ उत्तम होता. 1996 व 2011 मधील सामन्यात आमचे वर्चस्व होते. पण, त्यावेळीही अंतिमतः आमच्या पदरी निराशाच आली’.