केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दावा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
येत्या काही वर्षांत भारतातील रस्तेही अमेरिका आणि युरोपियन देशांसारखे होतील असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. दिल्लीत सीआयआय आयोजित इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह 2021 मध्ये केंद्रीय मंत्री गडकरी बोलत होते. मोदी सरकारच्या कार्यकाळानंतर भारताचे रस्ते बरेच सुधारले आहेत. केंद्र सरकार दररोज 35 किलोमीटरचा रस्ता तयार करीत आहे. लवकरच, दररोज 40 किमी रस्ते तयार करण्याचे उद्दिष्टही पूर्ण केले जाईल, असे गडकरी म्हणाले.
रस्ते तयार करण्यासाठी जलदगती बांधकाम करण्यासाठी एक लाख कोटी रुपये उभे करण्याची योजना आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण येत्या पाच वर्षांत एक लाख कोटी रुपये उभे करण्याच्या योजनेवर काम करत आहे. हे पैसे स्टॉक मार्केटमधून गोळा केले जातील. त्यांनी या संदर्भात इंडस्ट्रीजना पुढे येण्यास सांगितले आणि गुंतवणूक करून त्याचा फायदा घेण्यास सांगितले. यामुळे वाढीस गती मिळेल आणि हा निधी मजबूत पायाभूत सुविधांच्या वित्त पुरवठय़ासाठी वापरला जाऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. कोरोना महामारीनंतरही सरकारने टोल वसुलीत 10 हजार कोटींची वाढ नोंदविली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. बाजारपेठेत मालमत्ता विक्री (विक्री किंवा लीज) ही उद्योगांसाठी चांगली व्यवसाय संधी आहे. तसेच पायाभूत सुविधांमध्ये केलेल्या गुंतवणूकीचे मूल्य काढण्यातही सरकारला ही मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.