महाविकास आघाडीच्या झोळीत मतांचे दान टाकण्याचे आवाहन: भाजपकडून जातीपातीचे राजकारण सुरु असल्याची टीका
ऑनलाईन टीम/तरुण भारत
आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने ज्या जयश्रीताईंचे कुंकू पुसले गेले त्यांच्याबद्दल अपशब्द वापरून त्यांना अपमानित करणाऱ्या भाजपला जागा दाखवण्याची वेळ आली आहे. कोल्हापूरच्या मातीची संस्कृती जपायची असेल तर महाविकास आघाडीला भक्कमपणे साथ द्या. जयश्री जाधव या माऊलीला विजयी करा असा एल्गार महाविकास आघाडीच्या युवा नेत्यांनी केला. कोल्हापुरातील दसरा चौकात युवकांच्या भव्य मेळाव्यात युवा आमदारांची हाक घुमली.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमधील महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ सोमवारी सायंकाळी दसरा चौक येथे भव्य युवक मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये आमदार रोहित पवार, प्रणिती शिंदे, धीरज देशमुख, युवासेना सचिव वरुण सरदेसाई, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहूल पाटील, यशस्विनी राजे, यशराज राजे, विरेंद्र मंडलिक, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, हर्षल सुर्वे, राजवीर नरके, उदय पवार, महेंद्र चव्हाण, प्रसाद उगवे, ऍड. कल्याणी माणगावे, मंजित माने, सत्यजित जाधव, पूनम पाटील, श्वेता सुतार आदी युवक नेते, पदाधिकारी कार्यकर्ते व शहरातील युवा वर्ग मोठ्य़ा संख्येने उपस्थित होता.
आमदार धीरज देशमुख म्हणाले, 70 वर्षात काँग्रेसने काय केले असा प्रश्न भाजपकडून विचारला जात आहे. पण गेल्या सात वर्षात भाजपने काय केले ? ते आधी सांगावे. भाजपला जाब विचारण्याची संधी आता कोल्हापूरच्या जनतेला मिळाली आहे. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या विकासाचे अपुरे स्वप्न पुर्ण करण्यासाठी जयश्री जाधव यांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन देशमुख यांनी केले.
आमदार रोहित पवार म्हणाले, भाजपकडून कोल्हापुरात खालच्या पातळीवर राजकारण सुरु आहे. एखाद्या महिलेला, मातेला तुम्ही कसे बोलता यावरुन तुमची विचारसरणी दिसते. कोल्हापूरकर जे ठरवतात ते करुन दाखवतात. यामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल काँग्रेसच्याच बाजूने लागेल. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये केली. पण भाजपच्या लोकांकडून साधा निषेधही केला गेला नाही. यावरुन भाजपचे दुटपी राजकारण दिसून येत असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. कोल्हापूर आणि महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही असा टोलाही त्यांनी लगावला.
युवा सेना सचिव वरुण सरदेसाई म्हणाले, महाविकास आघाडी एकत्रित राहिल्यास भाजपचा भोपळा व्हायला वेळ लागणार नाही. कोल्हापूरात भाजपने शिवसेनेचा घात केला आहे. भाजपचे केवळ दबावतंत्राचे राजकारण आहे. कोरोना काळात भाजपने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत न करता पंतप्रधान केअर निधीसाठी मदत केली. यातून भाजपचा महाराष्ट्र द्रोही पणा दिसत आहे.
‘आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या…
प्रचारामध्ये विकासाचे मुद्दे मांडण्याऐवजी एका महिलेचा अपमान केला आहे. एक दुबळी, बिचारी महिला म्हणून आम्हाला डिवचू नका. मै लडकी हू….लढ सकती हू ….और विनाश भी कर सकती हूं ….! हे ब्रिद वाक्य भाजपने ध्यानात ठेवावे असा इशारा आमदार प्रणिती शिंदे यांनी दिला.
आमदार ऋतुराज पाटील म्हणाले…
शहरामध्ये पहिल्या महिला आमदार होण्याचा मान जयश्री जाधव यांना मिळणार असून युवकच हा इतिहास घडविणार आहे. विरोधकांकडे प्रचाराचे मुद्दे नसल्यामुळे वैयक्तिक टीका टिप्पणी केली जात आहे. जयश्री जाधव यांना विधानसभेत पाठविण्याची जबाबदारी नसून भाजपला जाब विचारण्याची संधी कोल्हापुरकारांना मिळाली आहे.
वीरेंद्र मंडलिक म्हणाले, भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांना महाडिकांनी बळीचा बकरा केला असून त्यांचा या निवडणूकीत टिकाव लागणार नाही.