23 डिसेंबरपासून यूएईमध्ये होणार स्पर्धा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संयुक्त अरब अमिरातमध्ये 23 डिसेंबरपासून सुरू होणाऱया यू-19 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी 20 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून दिल्लीच्या यश धुलकडे या संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
अखिल भारतीय कनिष्ठ निवड समितीने एकूण 25 सदस्यांची निवड केली असून त्यापैकी पाच खेळाडूंना राखीवमध्ये ठेवण्यात आले आहे. 11 ते 19 डिसेंबर या कालावधीत या संघाचे बेंगळूरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत तयारीचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. पुढील वर्षी जानेवारी-फेबुवारीमध्ये आयसीसीची 19 वर्षांखालील वयोगटासाठी विश्वचषक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी संघनिवड नंतर केली जाणार आहे.
यश धुलने दिल्लीतर्फे खेळताना या वर्षी झालेल्या विनू मंकड ट्रॉफी स्पर्धेत पाच सामन्यात 75.50 च्या सरासरीने 302 धावा जमविल्या होत्या. या कामगिरीची दखल घेत निवड समितीने त्याची कर्णधारपदी निवड केली आहे. भारताच्या युवा संघाने आशिया चषक स्पर्धा मागील आठपैकी सहा वेळा जिंकली आहे तर 2012 मध्ये भारत व पाकिस्तान यांना संयुक्त विजेतेपद मिळाले होते.
यू-19 स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ ः यश धुल (कर्णधार), हरनूर सिंग पन्नू, अंगकृश रघुवंशी, अंश गोसाई, एसके रशीद, अन्नेश्वर गौतम, सिद्धार्थ यादव, कौशल तांबे, निशांत सिंधू, देनेश बाना (यष्टिरक्षक), आराध्या यादव (यष्टिरक्षक), रंजनगड बावा, राजवर्धन हंगरगेकर, गर्व सांगवान, रवि कुमार, रिशित रेड्डी, मनव पारख, अमृत राज उपाध्याय, विकी ओस्टवाल, वासू वत्स (फिटनेसवर अवलंबून). राखीव खेळाडू ः आयुष सिंग ठाकुर, उदय सहारन, शाश्वत दांगवाल, धनुष गौडा, पीएम सिंग राठोड.