अन्यथा जमीन शेतकऱ्यांच्या नावे करून द्या, पालकमंत्री जयंत पाटील यांचा आदेश
प्रतिनिधी / शिराळा
शिराळा तालुक्यातील मणदूर येथील धनगरवाडा आणि विनोबाग्राममधील सात-बारा उताऱ्यामधील वनविभागाचे नाव कसे आले? त्यांचे पुरावे पंधरा दिवसात सादर करावेत अन्यथा जमीन शेतकऱ्यांच्या नावे करून द्यावी असे आदेश महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश दिला आहे. येथील तहसील कार्यालयात याबद्दल आयोजित बैठकीत ते बोलत होते.
शिराळा तालुक्यातील मणदूरचा धनगरवाडा आणि विनोबाग्राममधील शेतकरी गेल्या ८० वर्षांपासून यासाठी लढत आहेत.या दोन्ही वस्त्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन मध्ये येत असून मणदूर ग्रामपंचायतीला जोडल्या आहेत. येथील लोक पूर्वी पासून शेती कसत आहेत. वनविभागाच्या मते ही तुमची जमीनच नाही.याबत महसूल विभागाने १९६७ साली दिलेल्या आदेशात म्हटले आहे, १६६ एकर क्षेत्रावर वनक्षेत्र राहणार नाही. म्हणजे ते क्षेत्र धनगरवाडा, विनोबाग्राम यांचे आहे. तर वनविभाग सांगते तुम्हाला ३४ एकर पेक्षा (गट नंबर २२२ मधील) जास्त जमीन मिळणार नाही.त्यामुळे गट नंबर २२१ अ/ब/क मधील जमीन नेमकी कोणाची याबद्दल स्थानिक शेतकरी आणि वनविभाग यांच्यात गेल्या ८० वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. जयंत पाटील यांनी पंधरा दिवसांत तोडगा काढण्याचा आदेश प्रशासनाला दिला आहे