रयत संघटनेने आंदोलन करण्याचा दिला इशारा : सर्व समस्या दूर करण्याचे आश्वासन
प्रतिनिधी / येळळूर
येळ्ळूर येथील युनियन बँकेतून पीक विमा उतरविलेल्या शेतकऱयांना भरपाई देण्यात आली नाही. उलट शेतकऱयांकडूनच काही कागदांवर सह्या करून घेण्यात आल्या आहेत. याचबरोबर कर्ज माफ झाल्यानंतरदेखील माफ झाल्याची पत्रे देण्यात आली नाहीत. कर्ज माफ झाले नाही म्हणून वसुलीसाठी तगादा लावण्यात आला. त्यामुळे जिल्हा रयत संघटनेच्यावतीने त्या युनियन बँकेत जावून व्यवस्थापकांना जाब विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
येळ्ळूर येथील कॉर्पोरेशन बँक युनियनमध्ये विलीन झाली. पहिल्यापासूनच या बँकेबद्दल येळ्ळूरवासियांच्या तक्रारी आहेत. जे कर्ज परतफेड करणारे आहेत, त्यांनाच कर्ज देण्यात येत नाही आणि जे कर्ज भरणार नाहीत त्यांना मात्र कर्ज देण्यात येत आहे. त्याबद्दल ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. कृषीप्रधान म्हणून येळ्ळूर गाव ओळखले जाते. त्यामुळे शेतकरी कर्ज काढण्यासाठी या बँकेत गेले असताना त्यांना कर्ज देण्यात येत नाही. कर्जमाफी झाली तरी पुन्हा वसूल करण्यात येत आहे.
याबाबत तक्रारी वाढल्यानंतर रयत संघटनेचे कार्याध्यक्ष रवी सिद्धमणावर, जिल्हा उपाध्यक्ष राजू मरवे, शहराध्यक्ष हणमंत बाळेकुंद्री, महेश चतुर, मनोहर कंग्राळकर, सुभाष लाड यांनी बँकेत जावून व्यवस्थापकांना जाब विचारला. त्यामुळे ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडविण्याचे आश्वासन बँक व्यवस्थापकांनी दिले. यावेळी ग्राम पंचायत माजी सदस्य शांताराम कुगजी, राजू पावले, राजू उघाडे यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते. या बँकेतून यापूर्वी मोठी कर्जे घेतलेल्या अनेक जणांनी ती फेडली नाहीत. त्यांच्याकडे वसुलीसाठी तगादा लावा, असेही यावेळी सांगण्यात आले.