रत्नागिरी हापूस हंगामापूर्वी होते 3 महिने अगोदर उत्पादन
डझनाला 3 हजाराचा दर
प्रतिनिधी / रत्नागिरी
आठ वर्षांपूर्वी रत्नागिरीतून सातासमुद्रापार दक्षिण आफिकेतील मालावी प्रांतात लागवड केलेला हापूस आंबा सुमारे तीन महिने अगोदरच आता भारताच्या बाजारात विकीसाठी दाखल होऊ लागला आहे. रत्नागिरीच्या बाजारातही हा ‘मालावी हापूस’ सद्या येथील ओरिजिनल हापूस हंगामापूर्वीच विकीसाठी आलेला असून 3 हजार रुपये डझनाने तो विकीसाठी ठेवण्यात आलेला आहे.
आफ्रिका देशातील मलावी पांतात 600 हेक्टर जमिनीवर या हापूस आंब्याची लागवड करण्यात आली आहे. एका उद्योजकाने 2012 मध्ये दापोली येथून हापूस आंब्याची कलमे (मातृवृक्ष) आफ्रिका खंडातील मालावी देशात नेली. 40 हजार हापूस आंब्याच्या काड्या मलावीमध्ये नेल्या होत्या. मालावी हापूसचा हंगाम ऑक्टोबर महिन्यात सुरू होतो. डिसेंबर महिन्यापर्यंत मालावी हापूसचा हंगाम सुरू राहतो. मलावी मधील हवामान कोकणातील हवामानासारखेच उष्ण दमट असल्याने तिथे लागवड केलेल्या आंब्याला फळधारणा चांगली होत असल्याचे सिध्द झाले. त्यानंतर 2016 मध्ये या आंब्याचे उत्पादन सुरू झाले. त्यावेळी तुरळक प्रमाणात मालावी हापूस भारतात विक्रीसाठी पाठविण्यात आला होता.
तेथील आंबा भारतातील कोकणच्या हापूस हंगामापूर्वीच मलावी हापूस’ बाजारात दाखल होऊ लागलेला आहे. यामुळे कोकण हापूसच्या हंगामाअगोदरच ग्राहकांना हापूसची चव चाखण्यास मिळत आहे. हा आंबा राज्य आणि परराज्यांत उपलब्ध करण्यावर भर दिला जात आहे. आंब्यांच्या मोसमात यंदा रत्नागिरीकरांना आफ्रिकन मलावी हापूसची चव चाखता येणार आहे. कोकणातील हापूस आंब्याप्रमाणेच या हापूस आंब्याची चव, रंग, सुगंध असल्याने हा हापूस भारतीय बाजार पेठांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे. नवी मुंबईतील एपीएमसीमध्ये हा हापूस दाखल झालेला आहे. तेथील मार्केटमधून रत्नागिरीतील फळविकेते सतीश पवार यांनी गतवर्षीदेखील दिवाळीच्या हंगामातच मलावी हापूस विकीसाठी उपलब्ध केला होता. गतवर्षी रत्नागिरीत त्याला चांगला प्रतिसाद लाभला. त्यामुळे यावर्षी देखील पवार यांनी हा आंबा येथील बाजारात दाखल केला आहे.