ऑलिम्पिक विजेते खेळाडू, एनडीआरएफ जवानांच्या कार्याला सलाम
स्वातंत्र्यदिनीची मोहीम भारतीय संरक्षण दलास समर्पित
प्रतिनिधी / रत्नागिरी
भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त महाराष्ट्र राज्यातील सर्वोच्च शिखर कळसुबाई सर करीत शहरातील फाटक हायस्कूल व वि. स. गांगण कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी वैष्णवी दयाराम श्रीनाथ हिने ‘वंदे मातरम’, भारत माता की जय’ च्या जयघोषात देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला. यावेळी तिने ऑलिम्पिक विजेते खेळाडू, एनडीआरएफ जवानांच्या कार्याला सलाम करत स्वातंत्र्यदिनीची ही मोहीम भारतीय संरक्षण दलास समर्पित केली.
शारीरिक कसोटी पाहणारा खड्या चढाईचा मार्ग, संततधार पाऊस, धुक्यात हरवलेला परिसर, निसरडी-चिखलमय पाऊलवाट, शेवाळामुळे निसरडे झालेले खडक, ओले कातळकडे, हुडहुडी भरवणारी थंडी, सोसाट्याचा वारा, वन्यजीव अभयारण्यामधील दाट अंधार अशी अनेक आव्हाने या मोहिमेत होती. पहाटे 5 वाजता या मोहिमेची सुरुवात झाली. वैष्णवीने मोहिमेदरम्यान कलावंतीन, प्रबळगड, हरिहरगड, कळसुबाई आणि स्वराज्याची राजधानी रायगड चढाई करत सह्याद्रीच्या खोऱयात असलेले अतिकठीण सुळके सर केले.
वैष्णवी एप्रिल महिन्यात मनाली येथे बेसिक माउंटेनिअरींग प्रशिक्षणात `ए’ ग्रेडने उत्तीर्ण झाली. तिला तिचे वडील दयाराम व कुटुंबीयांनी तिला यासाठी भक्कम पाठिंबा दिला. मार्गदर्शक म्हणून आकाश प्रमोद पालकर यांचे सहकार्य तिला लाभले. वैष्णवी हिच्यासोबत नाशिक येथील अमोल तेलंग, विकास बोडके, गोपाळ, हरेश वडवले (मुरबाड), डॉ. समीर भिसे (राजगुरूनगर) या गिर्यारोहकांनी 5400 फूट उंच शिखरावर अभिमानाने तिरंगा फडकावला.
भविष्यात विविध शिखरे सर करणार
वैष्णवीने कळसुबाई सर करून स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकावत जिल्ह्याच्या अभिमानात भर घातल्याबद्दल तिचे विशेष कौतुक केले जात आहे. भविष्यामध्ये विविध शिखरे सर करण्याचा वैष्णवीचा मानस आहे. कळसुबाईवर राष्ट्रध्वज फडकावताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या लोकोत्तर व्यक्तींसह स्वतंत्र देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या जवान, खेळाडू, शास्त्रज्ञांविषयी कृतज्ञता व्यक्त केल्याचे वैष्णवी म्हणाली.