ढगाळ वातावरणाने थंडी गायब, बागायतदार धास्तावले
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कधी थंडी तर कधी वाढलेले तापमानात या हवाबानातील चढऊतारांमुळे येथील आंबा, काजू हंगाम धोक्यात आला आहे. गेले दोन दिवस निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणानंतर सोमवारी पहाटे रत्नागिरीत अनेक भागात पावसाचा शिडकावा झाला आहे. ढगाळ वातावरण कायम राहिल्याने बागायतदार काळजीत पडले आहेत. त्यातच 5 ते 8 जानेवारी दरम्यान दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह तुरळक पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवल्यामुळे या चिंतेत भर पडली आहे.
उत्तर भारत, मध्य प्रदेश, राजस्थान, कच्छ या परिसरात थंडीची लाट आली आहे. मात्र मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील बहुताश भागातील किमान तापमान सरासरापेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे. निर्माण झालेल्या ऍन्टी सायक्लोनमुळे उत्तर ऐवजी पूर्वेकडून वारे वाहत असल्याने हे बदल होत असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे.
बंगालच्या उपसागराकडून येणारे वारे आंध्र प्रदेश, तेलंगणामार्गे सध्या राज्यात येत आहेत. त्यामुळे उत्तरेकडील वारे मध्य प्रदेशपर्यंतच रोखले गेले आहेत. त्याचा परिणाम म्हणून उत्तरेकडे अनेक ठिकाणचे किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. त्याचवेळी लगतच्या विदर्भातील किमान तापमान 13 ते 15 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. उत्तरेकडून थंड वारे दक्षिणेकडे येतात तेव्हा त्या राज्यात कडाक्याची थंडी येते. सध्या पूर्वेकडून दक्षिणेकडे वारे वाहत असल्याने उत्तरेकडून येणारे थंड वारे वाटेत अडवले जात आहेत. उत्तरेकडील थंड वारे येथे पोहचत नसल्याने राज्यात नेहमीप्रमाणे थंडी जाणवत नसल्याचे हवामान विभागाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश ठिकाणी सध्या उबदार वातावरण आहे. ही स्थिती अजून 4 ते 5 दिवस राहण्याची शक्यता आहे.
सतत बदलणाऱया अशा हवामानाचा जिल्हय़ातील आंबा, काजू बागायतदारांनी धसका घेतला आहे. अजूनही पिकाला पोषक थंडीचा थांगपत्ता नाही, त्यामुळे आंबा कलमांच्या मोहोरावर विपरित परिणाम झाला आहे. त्यात बदलत्या वातारवणामुळे किडरोगांचा प्रार्दुभाव वाढत आहे. अशावेळी सोमवारी 4 रत्नागिरीत ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा शिडकावा झाला. या पावसाचे संकट आंब्यावर विपरित परिणाम करणारे ठरणारे आहे. राज्यात सोमवारी गेल्या 24 तासांत सर्वात अधिक तापमान कोकणात नोंदविण्यात आले आहे. त्यामध्ये रत्नागिरी 22.4, पणजी (गोवा) 24.8, मुंबई 21.6, कोल्हापूर 21.1, महाबळेश्वर 15.4, तर सर्वाधिक कमी किमान तापमान नागपूर येथे 14.6 इतके नोंदवले गेले आहे.