प्रतिनिधी/ रत्नागिरी
जुलैच्या मध्यापर्यंत जिल्हाभरात धुवाधार बरसून ओसरलेल्या पावसाने जिल्हय़ातील बळीराजाच्या तोंडचे पाणी पळवले होते. ‘पुष्य’ म्हणजे ‘म्हाताऱया’चे नक्षत्र कोरडे गेले, मात्र नव्याने सुरू झालेल्या ‘आश्लेषा’ नक्षत्रात शुक्रवारी सकाळपासूनच रत्नागिरीत धुवाधार सरी बरसल्या. सुमारे 10 दिवसांच्या दडीनंतर पाऊस जोरदार बरसल्याने शेतकऱयांना दिलासा मिळाला आहे.
यावर्षी जुलैच्या प्रारंभापर्यंत सर्वत्र दमदार पर्जन्यमान झाले होते. त्यामुळे शेतीची कामे वेगाने झाली. जिह्यातील 68 हजार हेक्टरपैकी 55 हजार हेक्टरवरील लावण्यांची कामे पूर्ण झाली. पुढे या पावसाने दडी मारल्यामुळे सुमारे 13 हजार हेक्टरवरील लावण्या रखडल्या आहेत. रखडलेल्या लावणीची कामे उरकण्यासाठी शेतकऱयांचे पावसाच्या जोरदार आगमनाकडे लक्ष लागले होते. पण भातपिके जोर धरण्याच्या काळातच पावसाअभावी शेतजमिनी कोरडय़ा पडून त्यांना तडे गेले. अनेक भागात करपा रोगाचा प्रादुर्भावही आहे. त्यामुळे शेतकऱयांच्या उरात घोर लागून राहिला होता.
शुक्रवारी सुमारे 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर जिह्यात पुन्हा मुसळधार पावसाने जोर धरला. तुरळक स्वरूपात सुरू होत दुपारी धो-धो पाऊस कोसळला. या पावसाने बळीराजाला दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाकडून जिह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जिह्यातील अजूनही सुमारे 13 हजार हेक्टरवरील पावसाअभावी रखडलेल्या लावण्यांच्या कामांना यामुळे चालना मिळणार आहे.
चौकट…..
‘म्हाताऱया’नंतर आलेल्या ‘सुना’ नर्तन करण्याची शक्यता
मृगानंतर येणाऱया आर्द्रा नक्षत्राचे वाहन मेंढा होते. या नक्षत्रात अपेक्षेप्रमाणे जिल्ह्य़ात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर ‘पुष्य’ म्हणजे ‘म्हातारा’ नक्षत्र व कोल्हय़ाचे वाहन म्हणजे पावसाची स्थिती कोल्हेकुईसारखी बानली जाते. त्याप्रमाणे जिल्ह्य़ात पावसाची ‘कोल्हेकुई’सारखी स्थिती राहिली. हे नक्षत्र कोरडेच गेले. आता 3 ऑगस्टपासून ‘म्हाताऱया’च्या सुना म्हणजे आश्लेषा नक्षत्राला प्रारंभ झाला आहे. मोर वाहन असलेल्या नक्षत्रात पाऊस मोराप्रमाणे नर्तन करणारा पडतो, असे म्हटले जाते. त्यामुळे हे नक्षत्र धो-धो बरसणार की नर्तन करून जाणार, याकडे बळीराजाचे लक्ष आहे. दापोलीत पावसाची रिपरिप सुरू
मौजेदापोलीः दापोलीत गेले काही दिवस गायब झालेल्या पावसाने गुरूवारपासून हजेरी लावली असून शुक्रवारीदेखील पावसाची रिपरिप सुरूच होती. गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त होता, परंतु गुरूवारी रात्री पावसाने चांगली हजेरी लावली. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने 61.2 मि. मी. पावसाची नोंद केली आहे.