मौजेदापोली / वार्ताहर
पावसाळा सुरू झाला की महसूल विभागाकडून प्रत्येक गावातील धोकादायक ठिकाणच्या नागरिकांना स्थलांतराच्या नोटीस बजावल्या जातात. मात्र अशा धोकादायक ठिकाणांवर कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात नसल्याची खंत दापोलीत नागरिकांमध्ये आहे. यात 10 ते 12 जून रोजी होणाऱया अतिवृष्टीमुळे दापोली तालुक्यातील समुद्रालगत तसेच धोकादायक ठिकाणी असलेल्या कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने तहसिलदारांनी तलाठी, मंडल अधिकारी तसेच महसूल विभागाच्या सर्व अधिकाऱयांना सूचना दिल्या आहेत.
10 ते 12 जून या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे महसूल विभागाकडून धोकादायक ठिकाणी राहणाऱया कुटुंबाना जवळील सुरक्षित शाळा, मंदिर या ठिकाणी स्थलांतरीत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दापोली तालुक्यात दाभोळ, हर्णै, पाजपंढरी, मुरूड आदी गावांतील धोकादायक ठिकाणी रहाणाऱया ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच स्वत:हून नातेवाईक किंवा सुरक्षित ठिकाणी रहावे. त्याचबरोबर कर्फ्यु जाहीर करण्यात आला असल्याने लोकांनी सुरक्षित ठिकाणी रहाण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.