दापोली / प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील महाड येथून रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत पर्यटना करिता आलेल्या आठ युवकांत पैकी दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली यापैकी एकाचा मृतदेह हाती लागला असून दुसऱ्या बुडालेल्या युवकाचा तपास अद्याप सुरू आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की रायगड जिल्ह्यातील महाड येथील नवानगर येथील सुतार सुतार आळीतील दीपक सुतार-19, प्रसंजीत तांबे-16, राजेश पवार -21, यश पवार-17, राहुल पवार -16, निखिल कोळंबेकर -18, सोहम सकपाळ -16 व शिवम सोंडकर -16 हे आठ मित्र मॅक्झिमो गाडी ने दापोलीत फिरण्यासाठी आले होते.
शनिवारी सकाळी ते पाळंदे समुद्रकिनारी आले. तेथे आल्यानंतर त्यांनी एका ठिकाणी नाष्टा केला व समुद्रकिनाऱ्यावर व समुद्रात पोहायला जायचा निर्णय घेतला. त्यांनी आपली मॅक्झिमो गाडी वाळूत नेल्यावर त्यांची गाडी वाळूत फसली. ही गाडी सर्वांनी मिळून बाहेर काढली. यानंतर सर्वजण समुद्रात पोहायला गेले.
शनिवारी अमावस्या असल्याने अमावस्येची ओहोटी होती. यावेळी पाण्याचा व ओहोटीचा अंदाज न आल्याने सर्वजण पाण्यात बुडायला लागले. यावेळी राकेश पवार हा चालक गाडीत बसला होता. उर्वरित 7 जणांपैकी सोहम सकपाळ व शिवम सोनकर यांनी सर्वजण बुडत आहेत हे लक्षात आल्यावर वाळूच्या दिशेने पळ काढला व ते वाचले. मात्र यात दीपक सुतार व प्रसंजीत तांबे यांचा दुर्दैवी मृत्यू ओढवला यापैकी दिपक सुतार याचा मृतदेह सापडून आला असून तो उत्तर तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे आणण्यात आला आहे मात्र यातील प्रसंजीत तांबे यांचा मृतदेह अद्याप सापडून आलेला नाही त्याचा ग्रामस्थ व पोलीस तपास घेत आहेत.
हे सर्व युवक एकमेकाचे मित्र होते हे शनिवारी सकाळी दापोलीत फिरण्यासाठी आले होते व येथे मौजमजा करून सायंकाळी पुन्हा आपल्या घरी रवाना होणार होते. मात्र दोन जण बुडाल्याने या सर्वांवर शोककळा पसरली आहे. हे सर्व जण समुद्रात बुडत असता सोहम सकपाळ, शिवम सोंडकर व चालक राकेश पवार यांनी मोठ्याने आरडाओरडा केला. यामुळे बीचच्या लगत असणारे निखिल बोरकर व अक्षर टेमकर यांनी तात्काळ समुद्रकिनारी धाव घेतली. तसेच आपल्याकडील दोऱ्या समुद्रातील पाण्यात फेकल्या. यामुळे यश पवार, राहुल पवार व निखिल कोळंबेकर यांना वाचवण्यात यश मिळाले. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.