खेड / प्रतिनिधी
राज्यात आलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत अनेक कुटुंबे उद्धवस्त झाली. ही परिस्थिती पूर्ववत आणण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे माझ्या वाढदिनी कुणीही शुभेच्छा द्यायला येऊ नये. पुष्पहार, पुप्षगुच्छ यासाठी होणारा खर्च आपद्गगस्तांनसाठी मदत म्हणून द्यावा, असे आवाहन माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केले आहे.
खेड, चिपळूणमधील पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश कदम व युवा कार्यकारिणी सदस्य सिध्देश कदम दिवसरात्र मेहनत घेत असून या परिस्थितीत कुणीही डगमगू नये. गेले चार दिवस पूरपरिस्थितीत खचलेल्या व्यापारी व नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्वच जण झटत आहेत. या अनुषंगाने सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून पूरग्रस्तांना आवश्यक त्या वस्तूंचे वाटप देखील सुरू आहे. या पुरामध्ये नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शक्य तेवढे जास्तीत जास्त सहकार्य जनतेला कसे करता येईल याकडे आपण सर्वानी लक्ष द्यावे. आपल्या बांधवांना पुन्हा उभे करण्यासाठी आपण सारे प्रयत्न करा. असे आवाहन रामदासभाई कदम यांनी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला केले.
पूररग्रस्तांसाठी वाटले जाणारे साहित्य मिळवण्यासाठी युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश कदम यांची मोठी मदत मिळाली असून शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, युवती सेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात मदतकार्यासाठी मेहनत घेत आहेत, असे आमदार योगेश कदम यांनी सांगितले.
शिवसेना महिला आघाडीच्या वतीने उद्या पूरग्रस्तांना कपडे, जीवनावश्यक वस्तू, ब्लँकेट, शर्ट, ड्राय फ्रूट, मॅगी, बिस्कीट पॅकेट्स, डाळ, तांदूळ, गहू, तेल, साबण, कडधान्य, पिण्याच्या पाण्याच्या बॉटल अशा सर्व जीवनावश्यक वस्तू चे वाटप करण्यात येणार आहे.युवा नेते सिध्देश कदम व शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या वतीने पूरग्रस्तभागातील नागरिकांची आरोग्य तपासणी सुरु करण्यात येणार आहे.