मंत्री उदय सामंत यांचा पुढाकार : मुदतवाढ, देयक वेळेत मिळण्याचे आश्वासन
प्रतिनिधी / रत्नागिरी
लॉकडाऊन पूर्वीपासून रत्नागिरी ‘हायटेक’ बसस्थानकाचे बांधकाम बंद असून याची मुदतवाढही संपत आली होती. मंत्री उदय सामंत यांनी या बाबत बुधवारी बैठक घेत ठेकेदाराला लवकरच काम सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. या बांधकामाला आता मुदतवाढ देण्यात येणार असून येत्या तीन-चार दिवसात पुन्हा कामकाज सुरू होईल तसेच ठेकेदाराला वेळेत देयक मिळावे यासाठी स्वत: पाठपुरावा करू असेही सामंत यांनी सांगितले.
रत्नागिरी येथील हायटेक बसस्थानकाचे काम देयक प्राप्त न झाल्याने ठेकेदाराने बंद ठेवले होते. त्यानंतर लॉकडाऊनमुळे हे काम रखडले होते. या बाबत पालकमंत्री तथा परिवहनमंत्री अनिल परब यांनी रत्नागिरी दौऱयावर असताना तातडीने देयकाचा प्रश्न मार्गी लावण्याचे जाहीर केले होते. मात्र अद्यापही रक्कम आदा न झाल्याने काम सुरू झाले नव्हते. ही बाब मंत्री उदय सामंत यांच्या लक्षात येताच त्यांनी एस.टी महामंडळाचे कार्यकारी अभियंता, संबंधित ठेकेदार यांची बुधवारी बैठक घेतली. बैठकीत बांधकाम रखडता कामा नये, अशा सूचना त्यांनी केल्या. त्यामुळे येत्या 2 दिवसात बांधकामाला सुरूवात होणार आहे. बांधकामाची मुदत 2 महिनेच शिल्लक असली तरी कोरोनामुळे फुकट गेलेला वेळ विचारात घेऊन मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.