प्रतिनिधी / खेड
तालुक्यातील वेरळ येथील अनुग्रह विशेष स्कूलमध्ये धडे गिरवणाऱ्या तब्बल ७० मतिमंद विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारातच असून कोरोनामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष वायाच गेले आहे. अनुग्रह स्कूलमध्ये ग्रामीण भागातून मतिमंद विद्यार्थी शिक्षण घेतात. मार्चपासून कोरोनाच्या लॉकडाऊननंतर सारेच ठप्प झाले. या कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थाही पुरती कोलमडली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच असल्याने शाळा महाविद्यालये सुरू करण्यास कोणीच राजी नाही. या पार्श्वभूमीवर बहुतांश शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. या शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी ऑनलाईन धडे गिरवत असले तरी मतिमंद विद्यार्थ्यांची मात्र चांगलीच कुचंबना होत आहे.
या स्कूलमध्ये बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागात वास्तव्यास असल्याने इंटरनेट सेवा, मोबाईल रेंजअभावी शिक्षण घेवू शकत नाहीत. या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत आल्यानंतरच शिक्षण घेता येणार आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या विद्यार्थ्यांना शाळेत बोलवायचे कसे? असा प्रश्न उभा ठाकला आहे. हे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेवू शकत नसल्याने सर्व शिक्षण प्रक्रियाच थांबली आहे. यामुळे विद्यार्थ्याचे यंदाचे शैक्षणिक वर्ष वाया गेल्यातच जमा आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेण्याची नितांत गरज आहे.