प्रतिनिधी/ दापोली
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यातील मच्छीमारांचा परत गेलेला डिझेल परतावा त्यांना लवकरच मिळणार असल्याची महत्वपूर्ण माहिती उच्च तंत्र शिक्षण मंत्री व सिंधुदुर्ग जिह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दापोली येथे पत्रकार परिषदेत दिली. यामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यातील कोरोनाचा संकटाने पुरत्या पिचल्या गेलेल्या कोळी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हय़ातील तालुक्यांमध्ये कसे काम चालले आहे व तालुका प्रशासनाला अन्य कोणत्या मदतीची गरज आहे याचा आढावा घेण्यासाठी मंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांनी उत्तर रत्नागिरी दौरा केला. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार योगेश कदम, उपविभागीय अधिकारी शरद पवार, तहसीलदार समीर घारे, मुख्याधिकारी महादेव रोडगे, नगराध्यक्षा परवीन शेख आदी उपस्थित होते.
यानिमित्त दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सामंत मच्छीमारांच्या डिझेल परताव्याबद्दल बोलताना पुढे म्हणाले की, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यातील मच्छीमारांचा 32 कोटींचा डिझेल परतावा 27 मार्च रोजी प्राप्त झाला होता. मात्र तो 31 मार्च रोजी परत गेलेला आहे. तो डिझेल परतावा आता रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यातील सर्व मच्छीमार बांधवांना लवकरच मिळणार आहे. तसेच लॉकडाऊन वाढला असल्याने पुढील चौदा दिवस महत्त्वाचे आहेत असे सांगून भविष्यातदेखील हा संयम बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले.
ऑफलाईन धान्य वाटपाबाबत बोलताना सामंत म्हणाले की, याबाबत खासदार विनायक राऊत यांनी केंद्राकडे पाठपुरावा केला आहे. त्यानुसार आपले कालच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी बोलणे झालेले आहे. थोडय़ाच दिवसांमध्ये ऑफलाईन कार्डधारकांनादेखील जिह्यांमध्ये धान्याचे वाटप होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत उपयुक्त सूचना दिलेल्या आहेत. त्यांच्या सूचनेनुसार रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यात एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही याची खबरदारी आपण व प्रशासन घेत आहे. दापोलीमध्ये सुरू असलेल्या शिवभोजन सेवेत आणखी शंभर थाळ्या वाढवून देण्यात येणार आहेत. शिवाय सध्या दापोलीत फक्त दुपारचे जेवण मिळत आहे. ते रात्रीदेखील सुरू करणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा सामंत यांनी केली. महाराष्ट्रामध्ये 1 लाख थाळ्या रोज देण्याचे शिवभोजन योजनेचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार जिह्यांमध्ये काम सुरू आहे. रात्रीच्या जेवणाचे अनुदान केंद्र चालकाला शिवभोजन योजनेतून मिळणार नसून ते जिल्हा नियोजनमधून किंवा अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून देण्यात येईल असे ते म्हणाले.
20 एप्रिलनंतर सुरू होणाऱया कामाबाबत ते बोलताना म्हणाले की, वाडय़ा व गाव जोडणारे पूल आणि रस्ते ही कामे प्राधान्यक्रमाने करायची आहेत. ही कामे जिल्हाधिकाऱयांनी तातडीने मंजूर करायची आहेत. पावसाळ्यामध्ये कोणत्याही गावाचा किंवा वाडीचा संपर्क तुटणार नाही याची काळजी घेऊन अत्यावश्यक साकव व रस्ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले. काही गावांमध्ये आठवडय़ातून केवळ एक अथवा दोन दिवसच दुकाने उघडी राहतात. याबाबत बोलताना ते म्हणाले की, हा त्या गावांनी घेतलेला सावधगिरीचा उपाय आहे. 3 मेनंतर जिह्यात चाकरमानी दाखल होतील. त्यानंतर उद्भवणाऱया परिस्थितीबद्दल पत्रकारांनी विचारले असता 3 मेनंतर वाहतुकीची कोणती साधने व पर्याय सुरू होणार आहेत याबाबत केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सूचना अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. यामुळे 3 मेनंतर काय परिस्थिती असेल व त्यावर काय उपाययोजना करायच्या आहेत याचा निर्णय त्यावेळी कोणत्या सूचना येतात यावर अवलंबून असेल. यापूर्वी लोक सागरी मार्गाने येत होते, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. यानंतर लोकांनी रेल्वे ट्रकमधून येण्याचा पर्याय निवडला. आता संपूर्ण रेल्वे ट्रकवर रेल्वे पोलिसांची गस्त असते. यामुळे रेल्वे ट्रकवरूनदेखील लोकांना जिह्यात पोचता येणे कठीण आहे. त्यामुळे लोक जंगलातून व मिळेल त्या मार्गाने जिह्यात येत आहेत. अशा लोकांना ग्रामसुरक्षा व ग्रामकृती समितीने तत्काळ प्रशासनाला कळवून त्यांना होम क्वारंटाईन करायचे आहे, असे ते म्हणाले.
जिह्यातील स्वॅबचे नमुने सध्या मिरज येथे तपासणीसाठी पाठवण्यात येतात. त्यामध्ये दोन दिवस वाया जातात. ही बाब पत्रकारांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर यापुढे स्वॅबचे नमुने पुणे येथेच पाठवण्याबाबत लवकरच निर्णय होईल असे ते म्हणाले. जिह्यामध्ये काहीठिकाणी झालेल्या गारपिटीबद्दल ते म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशा शेतकऱयांना सध्या नुकसानभरपाई देण्याबाबत कोणताही शासन निर्णय झालेला नाही. मात्र तहसीलदार, ग्रामसेवक व कृषी विस्तार अधिकाऱयांनी अशा शेतकऱयांचा सर्वे करावा अशा सूचनादेखील त्यांनी यावेळी दिल्या.
दापोली उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कुराडे यांची तातडीने नियुक्ती करण्यात येईल असेदेखील त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. आंबा व काजू बागायतदारांवर सध्या मोठे संकट ओढवले आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर कॅबिनेटची पहिली बैठक होईल व या बैठकीत आपण आंबा व काजू बागायतदारांचा प्रश्न प्राधान्यक्रमाने मांडणार असल्याचे सामंत म्हणाले. शिवाय जिह्यातील कोणत्याही बागायतदारावर आपण अन्याय होऊ देणार नाही असेही ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेपूर्वी नगर पंचायतीत सामंत यांनी अधिकाऱयांसमवेत आढावा बैठक घेतली. या बैठकीला उपविभागीय अधिकारी शरद पवार, आमदार योगेश कदम, माजी आमदार संजय कदम यांच्यासह प्रशासनातील सर्व अधिकारी उपस्थित होते.