ऑनलाईन टीम / बुलढाणा :
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आल्याची घोषणा संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे.
मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचा चांगला भाव मिळावा, या मागणीसाठी तुपकर यांनी नागपूर येथील संविधान चौकात 17 नोव्हेंबरच्या सकाळपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली नव्हती. दरम्यान, तुपकर यांची प्रकृती खालावल्याने संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी शुक्रवारी रास्ता रोको करत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केल्यानंतर रात्री अज्ञातांनी बुलढाणा तहसीलदार कार्यालयात उभ्या असणाऱ्या बुलढाणा तहसीलदारांच्या वाहनाला पेटविण्याचा प्रयत्न केला.
राज्य सरकारकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी तर केंद्र सरकारकडून देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनमुळे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.