वार्ताहर / नंदगड
नंदगड बाजारपेठेतील अनेक दुकानदारानी रस्त्यावरच आपला माल विक्रीसाठी ठेवला आहे. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्यावर लावावी लागत आहेत. यातून वाट काढताना गैरसोय होत असल्याची तक्रार ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.
येथील बाजारपेठ हे गावचे प्रमुख केंद्रस्थान आहे. बाजारपेठेत बँका, पतसंस्था व महत्वाची दुकाने आहेत. नंदगड येथे परिसरातील अनेक गावांच्या लोकांचा सातत्यांने संपर्क असतो. शाळा, दवाखाना, बँक व अन्य कार्यालयीन कामासाठी येथे रोज हजारो लोक ये-जा करत असतात. बुधवारी येथे आठवडय़ाचा बाजार भरतो. त्यामुळे साहजिकच बुधवारी बाजारपेठेत दुकाने लावली जातात. त्यामुळे बुधवारच्या दिवशी कोणाचीही कसलीही तक्रार नसते. परंतु आठवडय़ातील अन्य दिवस बाजारपेठेत ज्यांची दुकाने आहेत. त्यापैकी काही दुकानदार विक्री करण्यासाठी काही वस्तू आपल्या दुकानासमोरील प्रमुख रस्त्यावर आणून ठेवत आहेत. त्यामुळे येथे बाजारासाठी दुचाकी व चारचाकी घेऊन आलेल्या वाहनधारकांना रस्त्यावरच वाहने लावावी लागत आहेत. त्यामुळे भर रस्त्यावर रहदारीची कोंडी होत आहे.त्यामुळे पादचाऱयाना गर्दीतून वाट काढणे कठीण होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत व अन्य संबंधित अधिकाऱयांनी दुकानदारांना सूचना करणे गरजेचे आहे.
नंदगड ग्राम पंचायतीचे अध्यक्ष मल्लाप्पा देगांवकर यांनी 20 वर्षापूर्वी आपल्या कार्यकाळात रस्त्यावर विक्रीसाठी माल मांडून ठेवलेल्या दुकानदारांवर कारवाई केली होती. तर काही ठिकाणचे अतिक्रमण हटवले होते. त्यामुळे ग्रामस्थ व जनतेकडून मल्लाप्पा देगांवकरांचे अभिनंदन केले होते. दरम्यानच्या काळात नंदगडची बाजारपेठ सुव्यवस्थित बाजारपेठ म्हणून ओळखली जात होती.
अलीकडे वर्षभरात दुकानदारांनी आपले नियम बाजूला ठेऊन गटारीच्या बाहेर रस्त्यावरच आपले साहित्य विक्रीसाठी ठेवले आहे. तसे पाहता गटारीच्या आतच दुकानदारांची मालकी असते.
विकासाच्या बाबतीत नंदगड ग्रामपंचायत देशात पाचव्या नंबरची ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. ही स्तुत्य बाब असली तरी मुळातच नंदगड गावच्या जनतेला रहदारीचा त्रास होतोय, याचाही विचार करणे ग्राम पंचायतीचे कर्तव्य आहे. नूतन ग्रामपंचायत कमिटीने नुकताच कार्यभार हाती घेतला आहे. त्यांनी आता बाजारपेठेतील रहदारीच्या समस्येकडे लक्ष देणे गरजेचे आहे.