ऑनलाईन टीम / जयपूर :
राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट शनिवारी रात्री 22 आमदारांसह दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामुळे मध्यप्रदेशप्रमाणेच राजस्थान सरकारमध्ये राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन यांच्यात मागील काही दिवसांपासून वर्चस्ववाद सुरू आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळेराजस्थान सरकारमध्ये राजकीय अस्थिरता पहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी 22 आमदारांना हरियाणातील गुरुग्राममधील एका रिसॉर्टवर ठेवले आहे. शनिवारी रात्री हे आमदार ‘आयटीसी हॉटेल ग्रॅण्ड’मध्ये दाखल झाल्यानंतर हरियाणा पोलिसांच्या हॉटेल बाहेरील हालचाली वाढल्या आहेत. मध्यप्रदेशनंतर आता राजस्थानमध्ये भाजपकडून काँग्रेसचे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री गेहलोत यांनी काल म्हटले होते की, राज्यात कोरोनाचे गडद संकट उभे ठाकले असताना भाजपकडून अमानवी उद्योग सुरू आहेत. मध्यप्रदेश प्रमाणेच राजस्थानमधील काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी भाजपचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत.भाजपचे विधानसभेतील नेते गुलाबचंद कटारिया, उपनेते राजेंद्र राठोड आणि प्रदेश भाजप अध्यक्ष सतीश पुनिया हे काँग्रेसचे सरकार पाडू पाहतात. मात्र, हे सरकार स्थीर असून, कार्यकाळ पूर्ण करेल.