आगामी राजकीय वाटचालीवर दोन्ही नेत्यांत चर्चा
कोल्हापूर प्रतिनिधी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी स्वराज्य संघटनेचे संस्थापक माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेऊन चर्चा केली. नवी दिल्लीतील संभाजीराजे यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. उभय नेत्यांत आगामी राजकीय वाटचालीबद्दल सुमारे तासभर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शेतकऱयांचा आवाज असणारे राजू शेट्टी गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्तेवर असणाऱया महाविकास आघाडीपासून दूर गेले आहेत.त्यांनी विधानपरिषदेवर नियुक्त करण्यात येणाऱ्या बारा आमदारांच्या यादीतून आपले नाव वगळण्याची विनंती राज्यपालांना केली. सध्या सुरू असलेल्या राज्यसभा निवडणुकीच्या वातावरणात घडलेल्या राजकीय घडामोडीत संभाजीराजे चर्चेचा केंद्रबिंदू ठरले. त्यांनी राज्यसभा निवडणुकीत माघार घेत स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढत अन्यायाविरोधात लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. संभाजीराजे आणि शेट्टी हे दोन्ही नेते सध्या वेगळय़ा राजकीय वळणावर आहेत. त्यामुळे सोमवारी उभय नेत्यांची दिल्लीत झालेली भेट राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली. या भेटी संभाजीराजे आणि शेट्टी यांनी राज्यातील राजकीय स्थिती, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि साखर निर्यात निर्बंध या विषयी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मी दिल्लीत कामानिमित्त गेलो होतो. संभाजीराजे यांचा फोन आला. त्यांनी चहासाठी निमंत्रण दिले. त्यांच्या निवासस्थानी गेलो. विविध प्रश्न, विषयावर चर्चा केली. दोघांचे बहुजन समाज आणि शेतकऱयांच्या विकासासंदर्भात विचार समान आहेत.
राजू शेट्टी, संस्थापक अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना