प्रतिनिधी / मुंबई
विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीबाबतची कोंडी लवकरच फुटण्याची शक्यता आहे. त्या संदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यामुळे आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा आता मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाविकास आघाडी सरकारकडून 26 ऑगस्ट रोजी राजभवनाकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीची वेळ मागण्यात आली होती. पण राजभवनाकडून वेळ देण्यात आली नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले होते. मात्र त्याच दिवशी संध्याकाळी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर राजभवनावर दाखल झाले होते. त्यांनी राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितली. त्यानंतर राजभवनाकडून 1 सप्टेंबरला भेटीसाठी वेळ देण्यात आली होती.
खडसे, राजू शेट्टींबाबत प्रश्नचिन्ह
दरम्यान, राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना कदाचित वगळले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेट्टी यांच्या ऐवजी दुसरे नाव दिले जाण्याची शक्यता आहे. तर खडसे यांच्या पाठी ईडीची पीडा असल्याने राज्यपाल त्यांच्या नावाला आक्षेप घेण्याची शक्यता आहे.