प्रतिनिधी /वास्को
कोरोना संकटाच्या पहिल्या लाटेच्या वेळी आम्ही जे भ्रष्टाचाराचे आरोप सरकार आणि त्यांच्या विशिष्ठ मंत्र्यांवर केले होते ते सत्यच होते. राज्यपाल सत्यपाल मलीक यांच्या स्पष्टीकरणामुळे ते आरोप खरे होते हे सिध्दच झालेले आहे. आता तरी नैतीक जबाबदारीचे भान ठेवून मुख्यमंत्री व त्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी केली आहे. या भ्रष्टाचारात गुंतलेल्याविरूध्द आपण तेव्हाच पोलीस तक्रार केली होती. आता तरी त्यांच्याविरूध्द गुन्हा नोंद व्हावा अशी मागणी करून आमोणकर यांनी अन्यथा आम्ही पुढील कृती ठरवू असा ईशारा दिला आहे.
संकल्प आमोणकर यांनी मुरगाव गट अध्यक्ष महेश नाईक, सचिन भगत व इतर पदाधिकाऱयांसमवेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यपाल सत्यपाल मलीक सत्यच बोललेले असल्याचे स्पष्ट करून त्या वेळी आम्ही केलेले आरोपही खरे होते हेसुध्दा सिध्द झालेले आहे. राज्यपालांनी गोव्यातील सत्ताधाऱयांना उघडे पाडलेले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी वास्कोत कोरोनाचे संकट गंभीर होते. वास्कोत त्याच क्षणी लॉकडाऊन करावा अशी मागणी आपण आणि वास्कोतील भाजपाच्या नेत्यांनीही वारंवार केली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी या मागणीला दाद दिली नव्हती. त्यामुळेच गोवाभर कोरोनाची लाट पसरून अनेकांचे बळी गेले होते. मुरगाव बंदरातील खनिज वाहतुक व इतर व्यवहार सुरळीतपणे चालू होते. इतर राज्यांतील मालवाहू ट्रकांची मोठय़ा प्रमाणात ये जा चालू होती. याचा परीणाम कोरोनाच्या प्रसारात झाला होता. यामागे उद्योगांचे हित आणि पूर्णपणे भ्रष्टाचार हेच कारण होते. स्थानिक मंत्री मिलिंद नाईक या प्रकरणातील प्रमुख संशयीत आहेत. राज्यपालांना त्यावेळी आम्ही वास्कोत घडणाऱया गैरव्यवहारांची पूर्ण कल्पना दिली होती. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना त्यावेळी यासंबंधी योग्य सुचना केल्या होत्या. मात्र, मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना गांभीर्याने घेतले नव्हते. त्याकाळी जे काही संशयास्पद व्यवहार दिसून आले होते त्या प्रकरणी आपण पोलीस तक्रारही केली होती. त्यापूर्वी नु.सी. नलीनी या नाफ्तावाहू जहाज प्रकरणातील संशयास्पद व्यवहारही आपण चहाटय़ावर आणला होता. मुरगाव बंदरात खनिजाची चोरी झाली होती. त्या प्रकरणी आपण तकार केली होती. पोलिसांनी आपल्या तक्रारींची दखल घेतली नाही. मात्र, आपण न्यायालयात हा लढा चालूच ठेवलेला आहे.
कोरोना काळात जो भ्रष्टाचार झालेला होता, त्याचा उल्लेख राज्यपाल सत्यपाल मलीक यांनी आपल्या मुलाखतीत केलेला आहे. त्यामुळे आपण त्यावेळी केलेले आरोप किती खरे होते हे स्पष्ट झालेले आहे. किमान नैतीक जबाबदारी स्विकारून आता तरी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, त्यांचे मंत्री व जे कोणी या भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत, त्यांनी राजनीनामा द्यायला हवा आणि पोलिसांनी आता तरी अशा नेत्यांविरूध्द गुन्हे नोंद करावे अशी मागणी संकल्प आमोणकर यांनी केली. येत्या आठ दिवसांत त्यांच्याविरूध्द कारवाई झाली नाही तर पुढील कृती ठरवू असा ईशारा आमोणकर यांनी दिला आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणे काळाजी गरज बनलेली असून जनतेने आवाज काढू नये यासाठी भय निर्माण करण्यात येत आहे. राज्यपाल सत्यपाल मलीक यांनीही तेच सांगितलेले आहे असे संकल्प आमोणकर यांनी म्हटले आहे.